वर्धा : वर्धा तालुक्यातील पवनूर गाव आज सुन्न झाले आहे. शेतकरी कुटुंबातील वैष्णवी पुंडलिक बावणे या सतरा वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या करीत जीवन संपविले.ती शनिवारी बारावीचा पेपर देऊन घरी आली होती. थोड्या वेळाने शेतात गेली. काही वेळाने घरी परतली. तेव्हा ती विचारातच असल्याचे सांगितल्या जाते. परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने ती भयग्रस्त झाली होती. भीतीने विचारातच असतानाच घरी कोणीही नसल्याचे पाहून तिने विषारी औषध प्राशन केले.हा आत्महत्येचा प्रकार रात्रीच तिच्या काकाने पाहिला. त्याचवेळी तिला आंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती बिघडत चालली असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी पुढील आवश्यक उपचारासाठी वर्धेच्या सामान्य रुग्णालयात रेफर केले. मात्र वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी झाल्यावर अंत्यविधी करण्यात आले.





Social Plugin