Ticker

6/recent/ticker-posts

करंजा-रेवस रेड्डी या समुद्रीमहामार्गावरील नियोजित पुलांचे बांधकाम थांबवा-रायगड जिल्हा मच्छिमार संघाची मागणी



अलिबाग (रत्नाकर पाटील)

करंजा-रेवस रेड्डी या समुद्री महामार्गावरील नियोजित पुलांचे बांधकाम सुरू झाल्याने याठिकाणी कोळी मच्छिमार बांधवांना उद्भवणाऱ्या समस्या व त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानामुळे कोळी बांधव हैराण झाले आहेत. यासंबंधित अधिकारी व मच्छिमार प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक लावून तोडगा काढावा अन्यथा हे काम बंद करावे, यासंदर्भाचे निवेदन जिल्हाधिकारी रायगड यांना देण्यात आले आहे.

यावेळी रायगड जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकारी संघ मर्यादितचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष मनोहर बैले, रायगड जिल्हा मच्छिमार सेलचे अध्यक्ष सीताराम नाखवा, चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच अजय म्हात्रे, मुरुड, अलिबाग सोसायटीचे चेअरमन, करंजा -कोंढरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, देवयानी कोळी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाचा रेवस रेड्डी समुद्रीमार्ग हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. या कामास मंजुरी मिळून दोन ते तीन महिन्यांपासून रायगडमधील करंजा-रेवस, रेवदंडा-साळाव, दिघी-राजपुरी इत्यादी खाड्यांमध्ये जिओलॉजीकल सर्वेचे काम व बांधकाम सुरू करण्यात आले आहे. हा सर्वे प्रत्येक खाडीत दोन ते तीन महाकाय अशा जेकब बार्जेसव्दारे केला जात आहे. सर्वेचे काम खाडीत 100 ते 150 फुट खोल ड्रेजिंग करून केला जात आहे. या जेकब बार्जेसमुळे पारंपरिक मच्छिमारांना खाडीत जाळी लावणे व इतर अडचणी निर्माण झाल्या आहेत. ड्रेजिंगमुळे खाडीत प्रदूषण होऊन मासेमारीवर प्रतिकूल परिणाम होत आहे.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्याकडून ठेकेदारांना कळविण्यात आलेले आहे की, प्रत्यक्षात काम सुरू करण्या अगोदर खाडीतील बाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळावी. तसेच ठेकेदारांना काम करताना पोलीस संरक्षण दिल्याने मच्छिमारांवर दहशत निर्माण होईल असे वातावरण करून राजरोसपणे काम सुरू आहे. यामुळे मच्छिमारांना आपला रोजगार गमवावा लागत आहे. मच्छिमारांमध्ये असंतोष निर्माण होऊन त्यांच्या सहनशीलतेचा उद्रेक होण्याअगोदर आपण सबंधित अधिकाऱ्यांबरोबर संबंधित मागण्यांकरिता व समस्या सोडविण्याकरिता बैठक लावण्यात यावी. खाडीतील बाधित मच्छिमारांचा ताबडतोब सर्वे करण्यात यावा, सर्वे होत नाही तोपर्यंत सुरू असलेले काम बंद करण्यात यावे, केलेल्या कामामुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना नुकसानभरपाई मिळावी. तसेच सबंधित अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य मेरीटाईम बोर्ड, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड अलिबाग, प्रांत अधिकारी, तहसीलदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठेकेदार या संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला बोलवावे जेणेकरून मच्छिमारांच्या मागण्या व समस्यांचे निराकारण करता येईल, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. 

रेवस रेड्डी महामार्गाचे संबंधित जबाबदार अधिकारी यांच्याबरोबर लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावून मच्छिमारांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन निवासी जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी स्वीकारले.