2 हजार 658 लाभार्थ्यांना प्रतीक्षा; तांत्रिक बिघाडाचा लाभार्थ्यांना फटका
अलिबाग(रत्नाकर पाटील)
मोठा गाजावाजा करून रायगड जिल्ह्यात सर्वसामान्यांना घरकुल मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या घरकुल योजना राबविण्याचा संकल्प तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी सोडला होता. यामागे मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात आपले स्थान अढळ करण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न होता. त्यानुसार महिला दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात महिलांच्याच हस्ते घरकुलाच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले होते. परंतु, आता घरकुल योजनेतील तांत्रिक बिघाडामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल अडीच हजाराहून अधिक लाभार्थ्यांना फटका बसला आहे. तब्बल 2 हजार 658 लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळाला असून, दुसरा हातात कधी मिळणार? याकडे लाभार्थ्यांचे डोळे लागले आहेत.
रायगड जिल्ह्यात तब्बल 20 हजार 489 घरकुलांच्या भूमिपूजनाचा सोहळा 8 मार्च रोजी महिला दिनी पार पडला. प्रधानमंत्री जनमन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास, रमाई आवास योजना अशा विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांमधील लाभार्थ्यांना घरकुल बांधणीसाठीचा पहिला हप्ता मिळाला मिळाला आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री जनमन योजनेतील 1 हजार 160 तर प्रधानमंत्री आवास योजनेतील 1 हजार 498 लाभार्थ्यांचे घरकुल बांधणीसाठीचा दुसरा हप्ता थकला आहे. राष्ट्रीय पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थ्यांचे पैसे थकले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याचा फटका लाभार्थ्यांना बसला आहे.
पावसाळ्यापूर्वी नवीन घरकुल बांधून होईल म्हणून योजनेतील लाभार्थ्यांनी घरांचे बांधकाम सुरू केले होते. पहिल्या टप्प्यातील रक्कम या लाभार्थ्यांना वेळेत मिळाली होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील रक्कम खात्यावर जमा झाली नाही. त्यामुळे आता उर्वरित घरकुलांची कामे पूर्ण कशी करायची, हा प्रश्न लाभार्थ्यांसमोर आहे.
कोकणात पावसाला सुरूवात झाली आहे. घरकुलांची कामे अपूर्ण निधीअभावी अपूर्ण अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे वारा आणि पावसाचा मारा सहन करत उघड्यावर वास्तव्य करण्याची वेळ या कुटूंबांवर आली आहे. दुसरीकडे रोजगार हमी योजनेतून घरकुल बांधणीसाठी 27 हजार रुपये मिळणे लाभार्थ्यांना अभिप्रेत होते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैषाली पाटील यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची भेट घेतली, घरकुल योजनेचे थकीत हप्ते तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी काही आदिवासी लाभार्थीही उपस्थित होते.
राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात जास्त पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी घरकुल पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. या कुटूंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून योजनेचा दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करायला हवा.-डॉ. वैषाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या
तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रीय पोर्टलवरून लाभार्थ्यांच्या खात्यात दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळू शकलेली नाही. मात्र घरकुलाचा दुसरा हप्ता तातडीने जमा व्हावा, यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.-प्रियदर्शनी मोरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
Social Plugin