गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा तालुक्यातील गाव पानगव्हाण येथील शेत सर्वे नंबर २९ मधील शेतात सोंगून ठेवलेल्या हरभरा गंजीला विकृती असलेल्या अज्ञात माथेफिरूने लावलेल्या आगीत हरभरा गंजी जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाले असून ही घटना १ मार्चच्या सकाळी श्रीमती उषाताई प्रल्हाद सुलतान यांचे शेतात घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार श्रीमती उषाताई प्रल्हाद सुलतान यांचे पानगव्हाण येथे शेत नं. २९ मध्ये ३ हेक्टर ३ आर एवढे क्षेत्र असलेली जमीन आहे. त्यांनी हे शेत रब्बी हंगामातीलपिकाकरिता आता पानगव्हाण येथील शिवाजी पवार यांना बटईने दिले होते. बटईदार शिवाजी पवार यांनी हरभरा पिकाची पेरणी केली होती. हरभरा सोंगणी नंतर शेतात गंजी मारुन ठेवली असतांना अंदाजे ८० क्विंटल हरभरा गंजीला १ मार्च रोजी सकाळी ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात विकृतीच्या इसमाने आग लावल्याने गंजींने पेट घेतला व संपूर्ण गंजी आगीने घेरल्या गेली. ज्यामुळे गंजी जळून अंदाजे ८० क्विंटल हरभरा खाक झाला. यामध्ये ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरहू घटनेचा पंचनामा तलाठी कु. रुपाली धोटे व कोतवाल कु. उमिता राठोड यांनी केला. यावेळी गावचे पोलीस पाटील संदीप सुपनर उपस्थित होते.





Social Plugin