जिल्ह्यातील नद्या इशारा पातळीजवळ; रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत
अलिबाग (रत्नाकर पाटील)
रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात रविवारीपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून, रस्ते जलमय झाले आहे. या पावसात शेतांसह नद्या, विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. जिल्ह्यातील अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी अशा सहा नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. मात्र, असाच पाऊस सुरू राहिल्यास इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पावसात अनेकांच्या घरांची पडझड झाली असून शेळ्या-मेढ्यांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने जिल्हाभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अलिबाग शहरातील कामगार नाका परिसरासह अलिबाग एसटी बसस्थानकात पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, जिल्ह्यातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे मार्गावरील वाहनांचा वेग मंदावला. काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहने चालविताना तारेवरची कसरत करण्याची वेळ वाहन चालकांवर आली. जिल्ह्यामध्ये पडलेल्या पावसामुळे विहिरींसह धरणेदेखील पाण्याने भरून गेली आहेत. त्यामुळे धरणांजवळील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांतील नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून, तालुका व ग्रामपातळीवरील प्रशासनाला लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या आहेत.
जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गासाठी रस्त्याच्या कडेला असलेले डोंगर पोखरण्यात आले आहेत. माती, दगडांचा वापर भरावासाठी केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांकडील दुतर्फा दरडीचा धोका निर्माण झाला आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केल्याने हानी पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
नद्यांवर दृष्टीक्षेप (संध्याकाळी पाच वाजेपर्यंत)
नदीचे नाव इशारा पातळी धोका पातळी सध्याची पातळी
सावित्री नदी 6 मीटर 6.50 मीटर 2.90 मीटर
अंबा नदी 8 मीटर 9 मीटर 6.25 मीटर
कुंडलिका नदी 23 मीटर 23.95 मीटर 22.40 मीटर
पाताळगंगा नदी 21.52 मीटर .18.80 मीटर
गाढी नदी 6 मीटर 6.55 मीटर 2.35 मीटर
उल्हास नदी 48.10 मीटर 48.77 मीटर 44.00 मीटर
मागील 24 तासांमध्ये सरासर पाऊस पडला आहे.सर्व तालुक्यांमध्ये शंभर मि.मी.पेक्षा कमी पाऊस असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच -गुरुवारी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Social Plugin