राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : “ जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे ! ” अशी प्रार्थना करण्याचा हा दिवस . ह्या दिवशी वडाची पूजा केली जाते . दीर्घकाळ जगणारा हा वृक्ष आहे त्यामुळेच हा एकमेव असा वृक्ष आहे जो अनंत काळापर्यंत बायकांची प्रार्थना देवा पर्यंत पोहोचवेल ह्या कल्पनेतूनच आपल्या पूर्वजांनी ह्या वृक्षाच्या पूजेचे संस्कार बाईच्या पदरात टाकले असावेत . त्यानंतर, मग ह्या संस्काराला सावित्री,तिचा नवरा ,यम , त्याचा रेडा, यांची गोष्ट जोडली असावी.
बाईने जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे अशी प्रार्थना करायची आणि पुरुषाने काय करायचे ? किवा कुठली प्रार्थना करायची ? त्याने जर नकार घंटा वाजवली तर देवाची मोठी पंचाईत होणार . ऐकायचे कोणाचे असा त्याला प्रश्र्न पडणार ? मग ज्याची देवाकडे जास्त ‘वट’ आहे त्याचेच देव ऐकणार ! इथे सुद्धा ‘वटच’ निर्णायक निकाल देणार! बायकोने वडाला गुंडाळलेल्या सुताने जर देवाला तिचे म्हणणे समजत असेल आणि नवऱ्याला सध्याची बायको नको असेल तर त्याने बायकोने वडाच्या झाडाला गुंडाळलेले सूत वडाला उलट्या प्रदक्षिणा घालून सोडवायचे म्हणजे देवाला नवरोबांचे म्हणणे कळेल .
शेवटी वेढे देणे, गुंडाळणे आणि गुंता सोडवणे हेच जीवनाचे सार आहे . रोजच्या जीवनात आपण सतत तेच करत असतो . प्रत्येक वेळी गुंता करणारा आणि तो सोडवणारा बदलत असतो हे ही तितकेच खरे आहे. एकाने पसरायचे आणि दुसऱ्याने आवरायचे यालाच ‘ जीवन ऐसे नाव ’ असे म्हटले आहे .सध्या जन्मोजन्मी हाच अशी प्रार्थना करण्यापेक्षा ह्याच जन्मी आमचे ‘ सूत ’ चांगले जमू दे अशी याचना प्रत्येक नवरा बायकोने करावी अशी परिस्थिती आहे . आपल्या पूर्वजांचीसुद्धा अशीच इच्छा असावी म्हणूनच तर त्यांनी सूत जमण्यासाठी सुत वडाला गुंडाळायची प्रथा योजली असावी .सुतावरून स्वर्ग गाठता येतो ह्या म्हणीचा खरा अर्थ कळावा म्हणुनतर अति प्रचंड ,खूप काळ जगणाऱ्या ह्या वडाच्या झाडाची योजना केली असावी .
काळाच्या ओघात ह्या प्रथेचा अतिरेक झाला . शहरवासियाना जवळपास वडाचे झाड मिळेना म्हणून त्याच्या फांद्यांचा व्यवसाय सुरु झाला . पूजा करायला वेळ नाही म्हणून तुमची पूजा आम्ही करतो तुम्ही फक्त दक्षिणा द्या असे सांगणारे पुरुष आणि स्त्री भटजी अवतरू लागले . बिचाऱ्या त्या भटजींना अजून पाचपाच नवरे असणाऱ्या पांचालीची काय अवस्था होत असेल ह्याची कल्पना नसावी.
चढता आलेख कधीतरी उतरतोच या न्यायाने सत्य परिस्थीची जाणीव होऊन सध्याच्या शिकल्या सावरलेल्या मुली वडाची पूजा करत नाहीत . परिस्थिती कडे त्यांचे सजगपणे लक्ष असते . पुढील जन्माची काय शाश्वती ? शिवाय तो बाईचाच मिळेल याची काय शक्यता ? जन्मोजन्मी काय हवे या पेक्षाही या जन्मात काय मिळणे गरजेचे आहे याकडे त्यांचे बारीक लक्ष असते .त्यामुळे समस्त नवरोबांनी आणि नवरीबाईनी सुद्धा जपून वागावे हेच आजच्या दिवसाचे मतीतार्थी सांगणे आहे हे लक्षात असू द्यावे . हा समानतेचा जमाना आहे हे पण ध्यानात ठेवावे.
Social Plugin