शिक्षकांची 1 हजाराहून अधिक पदे रिक्त
अलिबाग (रत्नाकर पाटील)
मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ सुरू आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांची 1 हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. महत्वाचे म्हणजे मुख्याध्यापकांची 75 टक्के पदे रिक्त असून आठ तालुक्यातील शाळांमध्ये मुख्याध्यापकाचे एकही पद भरलेले नाही. शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रातील या अनागोंदी बाबत पालकवर्गात नाराजीचा सुरू आहे.
रायगड जिल्हयात अडीच हजाराहून अधिक जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळां आहेत. या शाळांमध्ये मुख्याध्यापक , उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक असे मिळून 6 हजार 231 पदे मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात 5 हजार 513 पदे असल्याचे पहायला मिळते. जिल्ह्यात शिक्षकांचया रिक्तपदांची टक्केवारी 17.3 इतकी आहे. मुख्याध्यापकांची 111 पदे मंजूर असताना केवळ 32 पदे भरलेली आहेत. महाड, माणगाव, म्हसळा , मुरूड, पेण, रोहा, श्रीवर्धन तळा या आठ तालुक्यात एकही मुख्याध्यापक कार्यरत नाही. एकीकडे खाजगी आणि इंग्रजी शाळांचे आक्रमण सुरू असताना दुसरीकडे सरकारी शाळांमधील शिक्षकांची कमतरता मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर परीणाम करणारे आहे.
रायगड जिल््यात नवीन इंग्रजी माध्यमांची संख्या दरवर्षी वाढते आहे.शहराबरोबरच गावागावातील पालकांचा कल इंग्रजी मध्यम शाळांकडे वाढल्याने जिल्हा परीषदेच्या शाळांमधील पटसंख्या झपाटयाने कमी होवू लागली आहे.ग्रामीण भागातील शिक्षकांची कमतरता भरून काढताना शिक्षण विभागाची ओढताण होते आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी शासनाने सेवानिवृत्त मानधन तत्वावर नियुक्ती देण्याचा नि र्णय घेतला होता परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. पटसंख्या कमी झाल्याने अनेक दोन शिक्षकी शाळा एकशिक्षकी झाल्या आहेत.यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.
जिल्हा परीषदेच्या शाळांचा विस्तार मोठा असल्याने विद्यार्थी गुणवत्तेच्या अनुषंगाने केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांचया कार्यक्षेत्रातील जिल्हा परीषद शाळांना भेटी देणे आवश्यक असते. परंतु ही पदे देखील मोठया प्रमाणावर रिक्त आहेत. केंद्र प्रमुखांची 228 पदे मंजूर आहेत. त्यातील 50 टक्के म्हणजे 114 पदे स्पर्धा परीक्षेतून भरायची आहे. परंतु मागील दोन वर्षांत स्पर्धा परीक्षाच झालेली नाही.
शासनाने जिल्हा परीषदेच्या शाळांसाठी नवीन शिक्षण संच धोरण आणले आहे. या धोरणानुसार प्राथमिक शाळांमधील सहावी ते आठवी च्या वर्गांसाठी शिक्षकांची संख्या कमी होणार आहे. या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होणार असल्याने पुढील काही दिवसात शिक्षकांची कमतरता भरून निघेल अशी आशा आहे.-पुनिता गुरव प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हापरिषद रायगड





Social Plugin