बाळासाहेब पवार प्रतिनिधी
एप्रिल महिन्यात सर्व धर्मीय सण मोठ्या प्रमाणात येत असून सोबतच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन करून नागरिकांनी आनंदात व शांततेत सण साजरे करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री संजय सोळंके यांनी केले. तसेच तुम्ही माझे कान, नाक, डोळे व्हा व प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी अध्यक्षीय भाषणातून बोलताना शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नगरपरिषद उमरखेडचे मुख्याधिकारी महेश कुमार जामनोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सरदार, नायब तहसीलदार सुभाष पाईकराव मंचावर उपस्थित होते. श्री संजय सोळंके पुढे बोलताना म्हणाले की लोकसभा निवडणुकी दरम्यान धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात कोणते फलक लावावे, धार्मिक कार्यक्रमात राजकीय प्रचार, झेंडे किंवा चिन्हाचा वापर करू नये तसेच लोकशाही जपण्याचा एक मार्ग म्हणजे मतदान करणे होय. कोणाचेही बॅनर लावताना नगरपरिषदेची परवानगी घेणे गरजेचे आहे.
तसेच मागील अनेक वर्षापासून उमरखेड शहराला अतिसंवेदनशीलतेचे लागलेले गालबोट पुसण्याकरिता भूतकाळ आपल्या हातात नाही परंतु भविष्यकाळ आपल्या हातात आहे. गाव कसे शांत ठेवावे हे नागरिकांच्या हातात आहे असे म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सिद्धार्थ दिवेकर, श्रीराम जन्मोत्सव समितीचे रमेश चव्हाण, कविता मारोडकर माजी न. प. सभापती दिलीप सुरते, प्रा. अनिल काळबांडे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस कॉन्स्टेबल संतोष राठोड यांनी केले यावेळी शांतता सभेला शहरातील शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार बांधव व महिला उपस्थित होते.





Social Plugin