Ticker

6/recent/ticker-posts

अंबड तालुक्यात 101 किलोमीटर शेत रस्ते मोकळे



प्रतिनिधी आकाश जळके 

    राजस्व अभियानांतर्गत गेल्या 26 जानेवारी पासून आजपावेतो अंबड तालुक्यात तहसीलदार चंद्रकांत शेळके ,  नायब तहसीलदार धनश्री भालचीम , नायब तहसीलदार महेंद्र गिरगे , त्या त्या ठिकाणचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी 56 प्रकरणात 101 किलोमीटर लांबीचे शेतरस्ते ,  शिवरस्ते , पानंद रस्ते मोकळे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे .

     महाराष्ट्र शासनाकडून महसूल विभाग राजस्व अभियान राबवित असते . जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी वेळोवेळी बैठका घेऊन राजस्व अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करण्याबाबतच्या सूचना सर्व तहसीलदार यांना दिल्या होत्या .  त्याचाच एक भाग म्हणून अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार ,  निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ , अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी ही मोहीम जोमाने राबविली . 

  तहसील कार्यालय अंबड येथील भिंती अत्यंत बोलक्या आहेत . त्यावर एखाद्या शेतकऱ्याचा रस्ता अडविण्यात आला असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 नुसार रस्त्याची कशी मागणी करावी , याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच एखाद्या शेतकऱ्याचा रस्ता कोणी अडविला असल्यास मामलतदार  अधिनियमातील कलम 5 नुसार असा रस्ता तहसीलदारांना खुला करता येतो . याबाबत माहिती देण्यात आलेली आहे . 

   तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी रुजू झाल्यापासूनच सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न आहेत याबाबत अभ्यास केला .  त्यांच्या लक्षात आले की बहुतांश शेतकरी यांचे रस्त्याचे प्रश्न आहेत . कुठे शिवरस्ता अडविण्यात आला आहे ,  तर कुठे पानंद रस्ता ,  तर कुठे 

बांधरस्ता अडविण्यात आला आहे .  त्यानंतर तहसीलदारांनी मंडळ अधिकारी तलाठी यांच्या बैठका घेऊन अशी प्रकरणे तात्काळ मार्ग मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. 

     नारायणगाव येथील नारायण बबन निर्मळ यांनी तहसील कार्यालय अंबड येथे  20 जून रोजी अर्ज देऊन विनंती केली होती की त्यांच्या मालकीच्या गट नं 298 मध्ये जाण्या येण्यासाठी रस्ता चक्रधर जनार्धन नेमटे व इतर यांनी अडवणूक केली आहे . तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी कल्याण माने  यांनी सर्व संबंधिताना 09 जुलै रोजी नोटीस देऊन प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष  महादेव बबन निर्मल यांना रस्ता मोकळा करून दिला . यावेळी  नारायणगावचे तलाठी दिगंबर कुरेवाड , वादी व प्रतिवादी हजर होते . 

      तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी अंबड तालुक्यातील शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की आपला रस्ता अडविण्यात आला असेल किंवा रस्ताच उपलब्ध नसल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा . अर्ज देताना अर्ज सविस्तर असावा . नेमक्या कोणत्या गटांच्या मधून रस्ता जाणार आहे, त्या खातेदारांची नावे ,  पत्ते व्यवस्थित दिल्यास पंचनामा करण्यास व सुनावनी घेण्यास अडचणी येत नाही व शेतकऱ्यास तात्काळ न्याय मिळू शकतो .

    तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि त्यांचे अधिनस्त अधिकारी,  कर्मचारी यांच्या रस्ते विषयक कामकाजामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे .