Ticker

6/recent/ticker-posts

पालिकेने विकास कामांच्या निविदासाठी दिलेली मुदतवाढ, पालिकेचे पितळ उघडे पाडणारे : संग्राम जाधव

 


आष्टा /प्रतिनिधी 

      आष्टा नगरपालिकेत दिनांक ११ मार्च २०२५ रोजी विकास कामाच्या निविदा प्रक्रियेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळेच नगरपरिषद प्रशासनाने दिनांक १७ मार्च २०२५ अखेर विकास कामांच्या निविदासाठी मुदतवाढ दिली आहे. 

त्यामुळे या निविदेच्या प्रकियेमध्ये पालिका प्रशासनाच्या सावळा गोंधळ असणाऱ्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वाळवा तालुका अध्यक्ष संग्राम जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

       यावेळी संग्राम जाधव पुढे म्हणाले, आष्टा नगरपालिकेवर गेली तीन वर्षे झाली प्रशासकराज असून गेल्या काही वर्षापासून पालिकेच्या विकास कामामध्ये हस्तक्षेप भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप वाढलेला दिसून येत असून पालिकेच्या अधिकाऱ्यांवर त्यांचा अंकुश असल्याचे वाटत आहे. केंद्र व राज्य शासनाची सर्व विकास कामे आम्हीच मंजूर केली असल्याचे भासवत आहेत.

      त्यातूनच मंगळवार दिनांक ११ मार्च २०२५ रोजी आष्टा नगरपरिषदेच्या वतीने शहरात वार्षिक रस्ते विकास नफा तोटा निधी योजनेच्या माध्यमातून २ रस्ते खडीकरण, २ बोळ काँक्रिटीकरण व २ रस्ते काँक्रिटीकरण या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत होती. यावेळी ठेकेदार त्यांना प्रक्रियेमध्ये भाग घेवू न देणे, धमकीचे फोन करणे तसेच निविदा फॉर्म संपल्याचे सांगणे, त्यांना फॉर्म न देणे याबाबत भाजपचे पदाधिकारी दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे समजले. त्यामुळे या संदर्भातील माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी युवकचे वाळवा तालुका अध्यक्ष संग्राम जाधव, अमित ढोले, महेश पाटील, दत्तात्रय मस्के, राजकेदार आटुगडे, कपिल कदम, कुणाल काळोखे नगरपरिषदेत गेलो असता त्याठिकाणी निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या एका ठेकेदाराने बयाणा रक्कमही भरली होती, फॉर्म भरताना त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अडवले. परंतु त्याठिकाणी आम्ही गेलो असता भाजपाचे प्रविण माने यांनी आमच्याकडे पाहत शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी दोघामध्ये धक्काबुकीही झाली.

       त्यावेळी त्याने भाजपचे पदाधिकारी व पाळलेले गुंड बोलावून संबंधित ठेकेदाराची कागदपत्रे चोरून नेण्याचा प्रकार केला. ही सर्व घटना आमच्यासमोर घडत होती. अशा प्रकारे भाजपकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत होता. त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही प्रकिया सुरू होती कि काय? असा सवालही आमच्या मनात आला.

     त्यामुळे याबाबत नगरपरिषदेचे अधिकाऱ्यांना जाब विचारून संबंधित निविदा प्रकिया रद्द करून पुन्हा ऑनलाईन प्रकिया राबविण्याची मागणी राष्ट्रवादी युवकच्या वतीने करण्यात आली. त्यानुसार ती मागणी मान्य करून नगरपालिका अधिकाऱ्यांनी संबंधित निविदा प्रकियेला ५ दिवस मुदतवाढ देऊन पुर्ण प्रकिया पारदर्शी व निकोप राबविण्याची ग्वाही दिली आहे. यावरूनच पालिकेचा सावळा गोंधळ जनतेसमोर येत आहे. ही विकास कामाची निविदा प्रक्रिया पोलिस संरक्षणात पारदर्शीपणे राबविण्यात यावी,  त्याचबरोबर दोन वर्षांत झालेल्या विकास कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. 

       यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक रघुनाथराव जाधव, माजी संचालक माणिक शेळके, दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे, राष्ट्रवादी लिगल सेलचे अॅड. अभिजीत वग्याणी, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले,  माजी नगरसेवक सतीश माळी, किरण काळोखे, अमित ढोले, राजकेदार आटुगडे, शरद आटुगडे, महेश पाटील, सुदर्शन वाडकर, समीर लतीफ, विनोद कोरे, दत्तात्रय मस्के, कुणाल काळोखे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .