ग्रामीण प्रतिनिधी/प्रसाद दिनकरराव :
उल्हासनगर शहरात रविवार पासून पावसाने जोर पकडला असून उल्हासनगरमधील गणेश नगर भागात मुसळधार पावसामुळे नाल्यावरील एक पूल कोसळला आहे.उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ५ गणेश नगर भागात नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, एका तरुणीचा थोडक्यात जीव वाचला आहे.या घटनेमुळे ५०० हून अधिक घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
हा पूल जुना आणि जीर्ण अवस्थेत होता. त्याची दुरावस्था झाली होती.या पुलाची डागडुजी करावी, यासाठी स्थानिकांनी अनेकदा आंदोलनं केले होते. तसेच नवा पूल बांधण्याची मागणी केली होती.मात्र उल्हासनगर महापालिका प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.काही नागरिकांनी पूल कोसळलेल्या ठिकाणी बसून प्रतीकात्मक रडण्याचे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. तसेच तात्काळ नवा पूल बांधून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची दुर्घटना ताजी असतानाच उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक ५ मधील गणेश नगर परिसरात रविवारी सायंकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे या भागात असलेल्या नाल्यावरील जुना पूल कोसळला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेनंतर परिसरात संतप्त वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी महापालिकेविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. आमचा मुख्य मार्गच बंद झाला असून, लहान मुलं, शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक, रुग्ण आणि महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. आता या पावसातच खोल नाल्यातून वाट काढत जायचे का असा संताप अनेकांनी व्यक्त केला आहे. तर येणाऱ्या दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. हा पूल कधीही कोसळेल!" असा इशारा नागरिक उल्हासनगर महापालिकेला वर्षांनुवर्षे देत होते, त्यामुळे महापालिकेने तत्काळ पावले उचलावीत आणि नवा पूल उभारण्यास सुरुवात करावी, अशी मागणी आता केली जात आहे.
Social Plugin