.
अलिबाग(रत्नाकर पाटील)
शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले स्वागत फलक..., विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत शाळेत स्वागत करणारे शिक्षक..., पाठ्यपुस्तकांचे करण्यात आलेले वाटप..., चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शाळेत मन रमन्यासाठी ठेवण्यात आलेली विविध खेळणी... अशा उत्साहपूर्ण वातावरणातही पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणार्या चिमुकल्यांनी फोडलेला हंबरडा व त्यांची समजुत काढणारे पालक तसेच शिक्षक..., असे चित्र सोमवारी (दि.१६) जिल्हाभरातील शाळांमध्ये दिसून येत होते. शनिवारी जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शाळा सुरु झाल्या आहेत.
सोमवार पासून २०२५-२६ या वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि पालकांमध्ये उत्साह होता. शिक्षण विभागानेही शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव उपक्रम राबवित साजरा केला. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा गेला. एखाद्या सणाची तयारी करावी त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनीही शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी केली. आठवडाभरापासून विद्यार्थ्यांची ही तयारी सुरू होती. शाळेच्या गणवेशाबरोबरच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात आले होते. शैक्षणिक सत्रासाठी लागणारे सर्व साहित्यांसह सोमवारी सकाळी विद्यार्थी शाळेत दाखल झाले.
शाळा प्रशासनानेही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. सुट्टी काळावधीमध्येे शाळांची रंगरंगोटी करण्यात आली होती. शाळांमध्ये प्रवेश करताच स्वागताचे फलक विद्यार्थ्यांच्या नजरेस पडत होते. प्रार्थना झाल्यानंतर जिल्हा स्तरावरील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा समिती सदस्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत होते. बहुतांश शाळांमध्ये १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती होती. तर विद्यार्थ्यांची उपस्थिती ८० ते ८५ टक्केपर्यंत राहिली.
विद्यार्थ्याचे गुलाबपुष्पाने स्वागत
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचे स्वागत करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या होत्या. त्यानुसार शाळांच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. शाळेच्या आवारात रांगोळी काढण्यात आली होती. तसेच शाळ्च्या आवारात विद्यार्थ्यांनी प्रवेश केल्यानंतर मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा समिती सदस्य विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करित होते. काही शाळांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करित शाळेचा पहिला दिवस साजरा केला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग तालुक्यातील नवंगाव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अलिबाग तालुक्यातील कुरुळ व मुरुड तालुक्यातील चोरढे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील शाळेला भेट देत विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासोबत संवाद साधला.
पुस्तके वाटप
सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद, खाजगी अनुदानीत शाळांमधील पहिली ते आठवी पर्यंतच्या १ लाख ८१ हजार विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटण्यात आली. तसेच सुमारे ९८ हजार विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, सॉक्स वाटप करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवसाचे कामकाज
विद्यार्थ्यांच्या उत्साहाबरोबरच शिक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. पहिल्याच दिवशी नव्या वर्गातील विद्यार्थ्यांची ओळख करुन घेणे, त्यांना अभ्यासक्रमाविषयी माहिती देणे, असे नियोजन दिवसभरात झाले. त्याच प्रमाणे अनेक शाळांनी शिक्षकांची बैठक घेऊन वर्षभरात करावयाच्या कामांचे नियोजन केले. तसेच तासिकांचे नियोजन व वेळापत्रकही ठरविण्यात आले. शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देत त्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने अनेक शाळांनी नियोजन केले आहे.
चिमुकल्यांचे मन रमन्यासाठी खेळण्यांचा आधार
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र तरीही शाळेची पहिल्यांदाच पायरी चढणारे विद्यार्थी शाळेच्या आवारात पोहचताच हंबरडा फोडत होते. या विद्यार्थ्यांना आपुलकीने शिक्षक समजावित होते. तसेच त्यांचे शाळेत मन रमावे यासाठी वर्गात विविध खेळणी ठेवण्यात आली होती. त्यामुळे थोड्या वेळातच रडणारे विद्यार्थी खेळण्यात दंग होत असल्याचे दिसून आले.
आज मुलीच्या शाळेचा पहिला दिवस असल्याने कमालीचा तणाव होता. शाळेत जाताना तीने रडू नये यासाठी मागील दोन तीन दिवसांपासून तीच्यासमोर सातत्याने शाळेचा विषय काढीत होतो. शाळेत जाण्यासाठी वह्या-पुस्तके, गणवेश, कंपास सारे काही तिच्या पसंतीने घेतले होते. मात्र शाळेत जाताना ती रडेल अशी भिती वाटत होती. मात्र ती हसत शाळेत गेल्याने चांगले वाटले.- स्वराली पाटील पालक
शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव साजरा केला. ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष व सदस्य या सर्वांना सामावुन घेवुन विद्यार्थ्याचे स्वागत फुल देवुन करण्यात आले. विद्दयार्थ्यांना पुस्तकांचे तसेच गणवेश वाटप केले गेले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करुन घेतली. विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत. शंकाचे निरसन केले गेले.: आर. के. पाटील शिक्षक
Social Plugin