तीन महिन्यांचे नाही, एकच महिन्याचे धान्य
अलिबाग (रत्नाकर पाटील)
पावसाळ्यात ग्राहकांची धान्य मिळविण्यासाठी धावाधाव होऊ नये म्हणून पुरवठा विभागाने जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला. त्याची जाहिरातबाजीदेखील मोठ्या प्रमाणात केली. परंतु, जून महिना संपण्याच्या मार्गावर असताना तीन महिन्यांचे धान्य दुकानांमध्ये पोहोचले नसल्याची माहिती समोर आली आहे. फक्त जून महिन्याचेच धान्य वितरीत झाले आहे. धान्य वितरणाच्या सावळागोंधळामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या 80 हजार 456 असून, त्यातील लोकसंख्या दोन लाख 51 हजार 626 इतकी आहे. प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांची संख्या तीन लाख 73 हजार 726 असून, त्यातील लोकसंख्या 15 लाख 10 हजार 883 इतकी आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांतील एक हजार 451 रास्त भाव दुकाने आहेत. जिल्ह्यामध्ये अंत्योदय योजनेंतर्गत दोन हजार 815.96 क्विंटल आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत सात हजार 519.415 क्विंटल असे एकूण दहा हजार 335.375 क्विंटल धान्य वाटप केले जाते. त्यामध्ये गहू आणि तांदूळ यांचा समावेश आहे. प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत प्रति लाभार्थी प्रति चार किलो तांदूळ व एक किलो गहू असे पाच किलो धान्य दिले जाते. तसेच, अंत्योदय योजनेंतर्गत प्रति शिधापत्रिकेला 25 किलो तांदूळ व दहा किलो गहू असे एकूण 35 किलो धान्य लाभार्थ्यांना वितरीत केले जाते. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरीत करण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. गुरुवारी (दि.13) जूनपर्यंत केवळ 15.2 टक्के धान्य वितरण झाले आहे. यामध्ये जून महिन्याचे सर्वाधिक असून, जुलै व ऑगस्ट महिन्याचे धान्य अत्यंत कमी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात तांदळापेक्षा गव्हाचा पुरवठा अधिक झाल्याची चर्चा आहे.धान्य वितरणामध्ये पुरवठा विभागाचा सावळागोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तीन महिन्याचे धान्य एकाच दिवशी मिळणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाटप प्रक्रियेत विलंब वाहतूक कंत्राटदारांची कार्यक्षमता अपुरी असून, जिल्ह्यातील कंत्राटी ट्रान्सपोर्ट पूर्ण क्षमतेने गोदामांमधून धान्याची उचल व रास्तभाव दुकानापर्यंत पोहोचू शकत नाही. जिल्ह्यात सात हमाल संस्था आहेत. या संस्थांचे ठेकेदार व माथाडी मंडळाच्या आडमुठ्या व असहकार भूमिकेमुळे धान्याची उचल वेळेत पूर्ण होत नाही. महिन्याच्या वीस तारखेच्या आत धान्य ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 25 ते 26 तारखेला धान्य येते. वाटप प्रक्रियेत अनावश्यक विलंब होत असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.
समन्वयाचा अभाव रायगड जिल्ह्यातील तहसीलदार, पुरवठा निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक व गोदाम व्यवस्थापक यांच्यातील क्षेत्रीय स्तरावर समन्वयचा अभाव आहे. यामुळे तीन महिन्यांचे धान्य वितरीत करण्यास अडथळे निर्माण झाल्याची चर्चा आहे. याबाबकत जिल्हा पुरवठा अधिकारी काय भूमिका घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रास्तभाव दुकानदारांची तारेवरची कसरत जिल्ह्यातील एक हजार 451 रास्तभाव दुकाने आहेत. या दुकानात एक महिन्याचे धान्य ठेवण्याची क्षमता असते. काही ठिकाणी एखाद्या लहानशा गाळ्यात, तर काही ठिकाणी बैठी चाळीप्रमाणे असलेल्या कौलारू अथवा पत्र्याच्या खोलीमध्ये धान्य ठेवले जाते. यावर्षी जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एका वेळी वितरीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, तीन महिन्यांचे धान्य दुकानांमधील गाळ्यामध्ये साठवून ठेवताना दुकानदारांना तारेवरची कसरत होणार आहे. पावसाळ्यात गळतीमुळे धान्य भिजण्याचा धोकाही अनेकांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यामध्ये धान्य वितरणाबाबतचे काम ढिसाळ सुरू आहे. तीन महिन्यांचे धान्य वितरण करण्याची सरकारची भूमिका योग्य असली, तरीदेखील जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार व पुरवठा निरीक्षण अधिकारी यांचे योग्य व्यवस्थापन नसल्याचे दिसून येत आहे. तीन महिन्यांचे धान्य वेळेवर पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. पावसाळ्यात नेटची समस्या कायमच भेडसावत असते. त्यामुळे ऑफलाईनद्वारे पुरवठा केल्यास नागरिकांचे हाल होणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.– मधुकर पाटील, माजी अध्यक्ष,रायगड जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटना
तीन महिन्याचे धान्य वितरण करणे शक्य नसल्याने प्रत्येक महिन्याचे धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्याचे धान्य देण्यात आले आहे. जुलै व ऑगस्ट महिन्याचे धान्य त्या महिन्यात दिले जाईल असे वरिष्ठ पातळीवर सांगण्यात आले आहे.– पुरवठा निरीक्षक
Social Plugin