Ticker

6/recent/ticker-posts

मान्सून पूर्व शेती मशागतीत बळीराजा गुंतला ; नांगरणीचा दर यंदा पाचशे रुपयांनी वाढला.



मालेगांव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा जोर आणखी तीव्र झाला. रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी कामाला गुंतला आहे. तर ट्रॅक्टर चे नांगरणी चा दर यंदा पाचशे रुपयांनी वाढला आहे. मागील पंधरा दिवस पावसाने नांगरणी करता आली नाही व ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कमी दिवसांत शेत पेरणी साठी तयार करण्यासाठी सर्वांना घाई झाली आहे.

    खरीप हंगामातील पेरणी पूर्व शेतीची कामे शेतकरी उरकून घेत आहेत. मालेगांव तालुक्यात शेतीच्या मशागतींच्या कामाला वेग धरला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या नेहमीच घसरणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिति खालावली आहे. पूर्वी जमिनीची मशागत बैल जोडीने केली जात होती. त्यामुळे शिवारामघ्ये या महिन्यांमध्ये बैलाच्या गळ्यातील गोघर-घाटीचा मंजुळ आवाज ऐकावयास मिळत होता. परंतु बदलत्या काळानुसार व विज्ञान युगामध्ये शेतीची मशागत ट्रॅक्टरच्या साह्याने शेती केली जाऊ लागली आहे. त्यामुळे आत्ता बैलांची संख्या कमी झालेली दिसून येते. अगदी मोजक्या शेतकऱ्याकडे बैलजोडी दिसून येते. जरी विज्ञान युगामध्ये अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने शेती केली जात असली, तरी ठराविक कामे बैलांच्या साह्याने केली जातात. आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे. त्यामुळे जमिनीची मशागत ट्रॅक्टरने करताना दिसून येत आहेत. 

यंदा डिझेलचे भाव वाढल्यामुळे जमीन नांगरणीचे दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षापर्यंत एकरी पंधराशे भाव होता. चालु वर्षी त्यात वाढ होऊन दोन हजार पर्यत गेल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा दर परवडणार नाही. मालाला भाव मिळत नाही. गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाचे वातावरण बदलले आहे. त्यामुळे शेतकरी आता खरीप हंगामाची तयारी करू लागला आहे. शेतीची नांगरणी बैलजोडीने किंवा ट्रॅक्टरद्वारे करतांना दिसून येते आहे. नांगरणी झाल्यावर त्याची वखरणी करून त्यात शेणखत पसरवण्याची कामे करीत आहे. पुन्हा जमीन बैलजोडीच्या साह्याने किंवा ट्रॅक्टरने बेड पाडण्याचे कामे सुरू आहेत. ८ जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भात यंदा मान्सून लवकरच सक्रिय होणार आहे. शिवाय भरपूर पाऊस येणार असाही अंदाज बांधला आहे. त्यामुळे शेतकरी शेतात नांगरणी, वखरपाळी नंतर जमीन पेरणी योग्य करून ठेवत आहे. यंदा पेरणीस लवकर सुरुवात होणार अशी खात्री शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे पेरणीपूर्व कामांना तालुक्यात सर्वत्र वेग आला आहे.