Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्षअभियानाचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी किशन जावळे



अलिबाग (रत्नाकर पाटील)-

 “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असून जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे केले. अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉल येथे आयोजित “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी सुर्यवंशी, प्रकल्प संचालक श्रीमती प्रियदर्शिनी मोरे, पेण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, आत्माराम धाबे, तहसिलदार विक्रम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, धरती आबा जनजाती ग्रामउत्कर्ष अभियान या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 02 ऑक्टोबर 2024 रोजी झाला असून या उपक्रमाचा कालावधी पाच वर्षांचा असला तरी एक वर्षातच आदिवासी बांधवांपर्यंत सर्व योजनांचा लाभ पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. देशातील आदिवासी बांधवांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ” संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यांतील 113 आदिवासी गावांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी होणार आहे. उर्वरित गावे देखील स्थानिक पातळीवर यादीत सामील केली जाणार आहेत

भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि प्रकल्प कार्यालय आदिवासी विभाग अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने धरती आबा जनभागीदारी अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात संवाद सेतू नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला असून आठवड्यातून दोन दिवस ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जातात. दर आठवड्याला अधिकारी किमान दोन आदिवासी वाड्यांना भेटी देतील, असा मानस देखील जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला. "गाव तिथे रोजगार" ही संकल्पना राबवून आदिवासी बांधवांचे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न केला जाणार असून आदिवासी वाड्यांमध्ये जाणारे रस्ते, आरोग्य तपासणी शिबिरे, आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पीएमजनमन व धरती आबा अभियानांतर्गत विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या वाड्यांमध्ये आजारी व्यक्तींना तातडीची मदत मिळण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. धरती आभा अभियानांतर्गत 17 विभाग सहभागी असून 25 प्रकारची कामे करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर विविध ठिकाणी कॅम्प घेण्यात येत असून, अधिकारीही या कॅम्पना भेटी देणार आहेत. हे अभियान केवळ शासकीय योजनेपुरते मर्यादित न राहता जिल्हा प्रशासनाचा प्रभावी सहभाग आणि नवकल्पनांमुळे अधिक प्रभावीपणे राबवले जाणार असल्याचे  जिल्हाधिकारी  यांनी सांगितले.

कार्यक्रमांमध्ये शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते. धरती आबा जनभागीदारी अभियान 15 ते 30 जून 2025 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे.  या कार्यक्रमांमध्ये तहसिल कार्यालय अलिबाग यांच्यामार्फत विविध स्टॉल मतदार नोंदणी, पुरवठा विभाग, संजय गांधी विभाग आणि सेतू विभाग यांचा समावेश होता.

या कार्यक्रमांमध्ये 43 नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. ज्या मतदारांच्या नोंदीमध्ये दुरुस्ती होती अशा मतदारांचे नमुना आठ चे 15 अर्ज याप्रसंगी भरून घेण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप, उत्पन्न वय आदिवास नॉन क्रिमीलेअर आणि जातीच्या दाखल्याचे वाटप तसेच कृषी विभागामार्फत कृषी बी बियाणे, आभा कार्डचे वाटप  करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले. कार्यक्रमापूर्वी आदिवासी बांधवांनी आपले आदिवासी नृत्य सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.