Ticker

6/recent/ticker-posts

इवलेसे रोप लावीयले द्वारी,त्याचा वेलू गेला गगनावरी,या मणीसारखी मातोश्री पर्यटन केंद्राची प्रेरणादायी कहाणी

 


अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

अंबड तालुक्याजवळील लालवाडी परिसरातील हिरवाईने नटलेलं ‘मातोश्री पर्यटन केंद्र’आज आपल्या स्थापनेचा तिसरा वर्धापन दिन साजरा करत आहे.केवळ तिसऱ्या वर्षात या ठिकाणाने निर्माण केलेला उत्साह आणि लोकप्रियता पाहता, हे केंद्र ग्रामीण पर्यटनासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

या यशामागे आहेत — नव्या विचारांनी शेतीकडे पाहणारे शेतकरी उद्योजक गोवर्धन पाटील उगले, ज्यांनी शेतीतून पर्यटनाची वाट धरून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा श्वास दिला आहे.

*शेतीतून पर्यटनाकडे*  *नवविचारांची वाटचाल*

“शेती म्हणजे कष्ट,पण त्यातून समाधान नाही,” असं सांगताना गोवर्धन उगले यांचा स्वर अनुभवातून आलेल्या वास्तवतेने भारावलेला असतो.बदलत्या हवामानाच्या झळा,घटणारा पाऊस,उत्पादनाला न मिळणारा दर — हे सगळं पाहून त्यांनी ठरवलं,‘शेती सोडायची नाही,पण शेतीतच काहीतरी वेगळं करायचं!’

*आणि त्या विचारातून जन्म झाला* — *मातोश्री पर्यटन केंद्रा’चा*.

निसर्ग,शेती आणि आनंद यांचा सुंदर संगम घडवणारे हे ठिकाण आज अनेकांना प्रेरणा देत आहे.

 *बारा एकरांवर उभं राहिलेलं स्वप्न*

सुमारे १२ एकरांवर विस्तारलेले हे पर्यटन केंद्र म्हणजे ग्रामीण सौंदर्याचा जिवंत आरसा.शेती आणि पशुपालन अनुभव क्षेत्र:येथे पर्यटकांना गाई, शेळ्या,कुक्कुटपालन यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.धान्य,फळबाग व भाजीपाला क्षेत्र:विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक शेती शिकण्यासाठी हे केंद्र आदर्श ठरतं.

*बालकांसाठी खेळ क्षेत्र:झोके,छोटा ट्रेन ट्रॅक, सायकलिंग झोन* 

शहरातील मुलांना खेड्यातील आनंदाचा अनुभव.

कुटुंबीयांसाठी विश्रांती गृह:मातीचा सुगंध, पारंपरिक झोपड्या,जिव्हाळ्याचं जेवण आणि लोकसंगीत —जणू निसर्गाच्या कुशीत विसावल्यासारखं.

 *निसर्ग,परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम*

गोवर्धन उगले यांनी या ठिकाणाला केवळ पर्यटनस्थळ न बनवता,‘शिक्षण आणि प्रेरणा देणारे केंद्र’ बनवले आहे.‘फार्म टू प्लेट’या संकल्पनेवर आधारित शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जातात.येणाऱ्या पर्यटकांना पारंपरिक शेतीपद्धती,स्थानिक संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा अनुभव मिळतो.

                                                स्थानिक रोजगार आणि गावाचा विकास

या उपक्रमामुळे परिसरातील युवक–युवतींना रोजगार मिळाला आहे.गावातील महिलांनी स्वयंपाक,हस्तकला आणि कृषी उत्पादन विक्रीतून स्वतःचा लघुउद्योग उभारला आहे.“आमचं गाव आता पर्यटकांचं आवडतं ठिकाण झालंय,” असं ग्रामस्थ अभिमानाने सांगतात.

तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हरित संकल्प पर्यटक,एक झाड”

१४ नोव्हेंबर रोजी तिसऱ्या वर्धापन दिनाच्या औचित्याने एक आगळीवेगळी मोहिम सुरू होत आहे —

“एक पर्यटक,एक झाड” प्रत्येक पाहुण्याने एक रोप लावायचं आणि त्या झाडाशी आपली नाळ जोडायची.या उपक्रमातून हरित क्रांतीचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे.

शेवटचा मणी विचार नापीक नसतो,तोच सुपीक जमिनीला फुलवतो

गोवर्धन पाटील उगले यांनी दाखवून दिलं की —

> “शेती ही नापीक नसते,विचार नापीक असतात.”

संकटात संधी ओळखणाऱ्यांनी नवा मार्ग दाखवला,आणि त्याच वाटेवर चालत आज मातोश्री पर्यटन केंद्र हे केवळ एक ठिकाण नाही, तर निसर्गाशी नाळ जोडणारी एक जीवनशाळा बनली आहे.

इवलेसे रोप लावीयले द्वारी,त्याचा वेलू गेला गगनावरी या मणीसारखे हे केंद्र वाढत राहो, फुलत राहो आणि गावागावात अशाच नव्या प्रेरणा रुजोत राहो