Ticker

6/recent/ticker-posts

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान; ‘कसं काय?’ मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.!!



मन्सूर शहा धोत्रा.भनगोजी.बुलढाणा, दि. 21 (जिमाका):--- 

राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत जनजागृतीसाठी सुरू करण्यात आलेल्या “कसं काय”मोहिमेला बुलढाणा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. यावेळी “कसं काय?” या जनजागृतीपर गीताचे तसेच विशेष पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, प्रधान सचिव निपुण विनायक तसेच मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते. ग्रामीण महाराष्ट्रात आरोग्य जागृतीची नवी चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे करण्यात येत असून गावागावांत आता “कसं काय?” हा प्रश्न आरोग्य जनजागृतीचा संदेश देत आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या पुढाकारातून माझं गाव, आरोग्य संपन्न गाव हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. या माध्यमातून स्वच्छता, पोषण, निरोगी जीवनशैली, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा तसेच आरोग्य सक्षमीकरण याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. “कसं काय” या विशेष गीताच्या माध्यमातून आरोग्यविषयक संदेश आकर्षक आणि प्रभावी पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गावागावांत या मोहिमेची व्यापक प्रसिद्धी केली जात आहे. विविध आरोग्य शिबिरे, ग्रामसभा, जनजागृती कार्यक्रम तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव हे अभियान ग्रामीण भाग अधिक निरोगी, स्वच्छ आणि आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून बुलढाणा जिल्हा या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत आहे.