प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव
चाळीसगाव : आगामी लोकसभा निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. चाळीसगावातील त्रिकूटाविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यास प्रांताधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून तीन गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. दोघांना प्रत्येकी एक वर्षासाठी तर अन्य एकास दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या संशयीतांविरोधात हद्दपारीची कारवाई
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये चाळीसगावातील राहुल आण्णा जाधव व शाम उर्फ आण्णा नारायण गवळी यांना प्रत्येकी एक वर्ष तर तिसरा संशयीत हैदरअली आसीफअली सैय्यद यास जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश चाळीसगाव उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद हिले यांनी पारीत केले आहेत.
पोलिसांनी दाखल केला होता प्रस्ताव
चाळीसगाव शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्यासाठी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या चाळीसगाव निरीक्षक संदीप पाटील यांनी प्रांताकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची चौकशी होवून त्रिकूटाला हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार विनोद भोई, तुकाराम चव्हाण आदींनी केली.





Social Plugin