नाशिक ,प्रतिनिधी ,अमन शेख,
महाराष्ट्रातील महायुती जनतेच्या भल्यासाठीच आहे. भाजप युती धर्म पाळणारा पक्ष असून महायुतीतील घटक पक्षांना सन्मान देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत केंद्र सरकारला सहाय्यभूत असे सक्षम सरकार महाराष्ट्रात देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.खोटे बोलणार्यांना घरचा रस्ता दाखवून द्यावा. राज्यात मजबूत सरकार उभे करावे, असे आवाहन केंद्रीय कामगार,वन पर्यावरणमंत्री तथा भाजपचे राज्य प्रभारी भुपेंद्र यादव यांनी केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश भाजपतर्फे आज नाशिकमध्ये आदिवासी कार्यकर्ता संमेलन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित, भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम इंगळे, खासदार डॉ. सुमेरसिंह सोलंखी, हेमंत सावरा, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी खासदार हिना गावित, माजी महापौर रंजना भानसी, आमदार नरेश पटेल, दिलीप बोरसे, अनुसूचित जनजाती राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गजेंद्रसिंह पटेल, गुजरात विधानसभेचे माजी सभापती आमदार गणपत वसावा, मध्यप्रदेश युवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.निशांत खरे,एन.डी गावीत, लक्ष्मण सावजी, सुनील बच्छाव, प्रशांत जाधव, यांच्यासह आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना यादव म्हणाले की, आदिवासी बांधव भारतीय संस्कृती जपण्याचे काम करत आहे. आदिवासींच्या उन्नतीसाठी भाजप सरकारचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत आदिवासींसह इतरांकरीता भाजप सरकारने आणलेल्या योजना शंभर टक्के घराघरात पोहोचविल्या आहेत. तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सरकारच्या योजना असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. भाजप सरकारने आदिवासी महिलांना स्वावलंबनाबरोबरच आर्थिक स्थैर्यही प्राप्त करून दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की,देशाच्या राष्ट्रपती या आदिवासी आहेत. उडीसा राज्यात भाजपचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री आहेत. याव्यतिरिक्त गुजरात छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये आदीवासींसाठी भरीव योजना राबविल्या जात आहेत. याउलट काँग्रेस सरकारने ५० वर्षात कुठलीही अनुकूल अशी कृती केली नाही. वाजपेयी सरकारच्या काळात सुरू झालेली पंतप्रधान ग्राम सडक योजना मोदी सरकारने पूर्ण केल्याचेही यादव यांनी म्हटले.
तसेच महाराष्ट्र सरकारतर्फे राबविण्यात येणारी लाडकी बहीण योजना अत्यंत प्रभावी ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांचा सन्मान सरकारकडून केला जात आहे. तसेच ७० वर्षांवरील वयोवृद्धांना मोफत आरोग्य सुविधा देण्याची योजना आहे.आगामी काळात जनहिताचे कामे पूर्ण करण्यासाठी महायुतीला बहुमत देण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहनही मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले.
दरम्यान, यावेळी सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनीही मार्गदर्शन केले. तर आभार माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी मानले.सूत्रसंचालन एन. डी.गावीत यांनी केले.या संमेलनास राज्यभरातून प्रतिनिधी नाशिकला आले होते.
.jpeg)




Social Plugin