Ticker

6/recent/ticker-posts

स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत हजार गुणांची परीक्षा



रायगडातील ग्रामपंचायतींची होणार तपासणी

अलिबाग(रत्नाकर पाटील)

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी निर्माण झालेल्या सुविधांचा प्रत्यक्ष वापर, परिसरातील स्वच्छता, प्लास्टिक मुक्तीची अंमलबजावणी व ग्रामस्थांच्या मानसिकतेत झालेल्या सकारात्मक बदलांची केंद्र शासनामार्फत तपासणी होणार आहे. यासाठी लोकसहभाग व श्रमदानातून सार्वजनिक सुविधा प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने केले आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतींची हजार गुणांच्या आधारे तपासणी होणार असून, यातून जिल्हा व राज्याचे गुणांकन निश्चित होईल. यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर 120 गुण, ग्रामस्थांचा प्रतिसाद 100 गुण, सुविधांच्या वापरासाठी 240 गुण तर प्रत्यक्ष निरीक्षणासाठी 540 गुणांच्या प्रश्नावलीचा समावेश आहे.

या पाहणी दरम्यान पुढील बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे. यात प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन, खतखड्ड्यांचे व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, कुटुंब भेटीद्वारे माहिती संकलन, वैयक्तिक शौचालयांचा वापर, हात धुण्याच्या सवयी, ओला-सुका कचरा वर्गीकरणासाठी दोन कचरा कुंडींचा वापर, ग्रामपंचायतीद्वारे नियमित कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थापन, मैलागाळ उपसासाठी उपलब्ध असलेली यंत्रणा व माहितीचा दर्शनी भागावर उल्लेख, धार्मिक स्थळे, शाळा, अंगणवाड्या, बाजारतळ यासारख्या ठिकाणांची स्वच्छता यांचा समावेश राहणार आहे.

त्रयस्थ संस्था प्रत्येक गावाला देणार भेट

ग्रामपंचायतींनी भविष्यात ही सुविधा बचतगट किंवा इतर संस्थांमार्फत शाश्वतपणे चालविण्याचे नियोजन केले असल्यास त्यालाही गुणांकनात महत्त्व दिले जाणार आहे. गावात स्वच्छता संदेश, सुजल संकल्पना व कचरा व्यवस्थापनातून महसूलनिर्मितीबाबत ग्रामस्थांना माहिती असणेही महत्त्वाचे ठरणार आहे. या संपूर्ण पाहणीसाठी त्रयस्थ संस्था जिल्ह्यातील प्रत्येक गावाला भेट देणार आहेत