Ticker

6/recent/ticker-posts

जगाच्या दृष्टीने भारत सर्वोच्च हाेण्यासाठी पिढी निर्माण करा-गीतकार प्रविण दवणे यांचे प्रतिपादन



अलिबाग (रत्नाकर पाटील)

 भरपूर टक्के मिळवणारे नागरिक आपल्याला निर्माण करायचे नाहीत,तर भारत जगाच्या दृष्टीने सर्वाेच्च हाेईल, असे नागरिक घडवायचे आहेत. यासाठीचा आजचा कार्यक्रम म्हणजे संस्कार आहे, असे प्रतिपादन लेखक गीतकार प्रविण दवणे यांनी केले.अलिबाग तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घे भरारी तसेच परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह गुणीजन शिक्षकांच्या सन्मानाचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता अलिबाग मेघा चित्र मंदिर येथे पार पडला.  त्याप्रसंगी प्रविण दवणे विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना बोलत हाेते.

समर्थ फाऊंडेशनच्या संस्थापक अॅड. मनस्वी मोहिते यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला हाेता. त्याला प्रिझम सामाजिक संस्थेचा हातभार लागला. मेघा चित्रमंदिर येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

तसेच मुरुड तालुक्यातील वळके येथील इलिझम रिसॉर्ट येथे देखील  विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.गुणवत्ता यादी ही तुम्ही मिळवलेल्या गुणाची यादी असते, मात्र व्यक्तीमत्व ही जीवनाची गुणवत्ता यादी आहे. याचा पुढील आयुष्यात कधीच विसर पडू देऊ नका, असा माेलाचा सल्ला दवणे यांनी उपस्थितांना दिला. सध्या पावसाचा हंगाम सुरु आहे. हा कालावधी म्हणजे बीयाणे पेरण्याचा, रुजवण्याचा आणि बहरण्याचा  ऋतू आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करण्याचा याेग समर्थ फाऊंडेशनने साधल्याचे दवणे यांनी स्पष्ट केले.

पुरस्कार हे जीवनात महत्वाचे आहेत. त्यासाठी काजळाची आेंजळ करावी लागेल. तेव्हाच यश तुमच्या पदरात पडले. शिक्षण घेतल्यावर नाेकरी, सर्वोच्च व्यवसाय, गलेलठ्ठ पगार, पदेशात जाऊन स्थायिक हाेण्याचे स्वप्न असा संकुचीत विचार मनात आणू नका. ते तर तुम्ही मिळवालच मात्र देशासाठी, समाजासाठी आपण काही तरी देणे लागताे. हा विचार मनात ठेऊन माणूस म्हणून जगाला शिका आणि शिकवा, असा संदेश देखील त्यांनी दिला.

तुमचे आता बालपण संपले आहे. आता तुमच्यातील किशाेर अवस्थाही पंख उघडण्यासाठी तयार आहे. याचाही विसर पडू देऊ नका. आता मिळालेल्या यशावर हुरळून जाऊ नका. कारण यश हे फ्रिजमध्ये ठेऊन नंतर वापरता येत नाही. त्यासाठी कायम मेहनत आणि जिद्द ठेवण्याची तयारी ठेवा असेही त्यांनी सांगितले. गरिबीत राहून संघर्ष कसा केला याचे किस्से दवणे यांनी उपस्थितांना सांगितले.

समर्थ फाऊंडेशनच्या संस्थापक अॅड, मनस्वी माेहिते यांचे प्रतिपादन

दहावी-बारावीत विद्यार्थ्यांचा गुणगाैरव करणे हा श्री समर्थ फाऊंडेशनचा एकमेव उद्देश नाही, तर प्रविण दवणे यांच्यासारख्या विचारवंतांचे विचार आजच्या पिढीला देणे हा त्यातील गाभा आहे. चांगले विचार, चांगले संस्कार विद्यार्थ्यांवर होऊन माणसातल माणूसपण जपणारी आधुनिक पिढी घडवायची आहे, असे प्रतिपादन श्री समर्थ फाऊंडेशनच्या संस्थापक अॅड. मनस्वी माेहिते यांनी केले. आज येथे आलेल्यांपैकी एकाने जरी हा विचार जाेपासला तर, आजच्या कार्यक्रमाचे सार्थक झाले असे समजू, असेही अॅड. मनस्वी मोहिते यांनी स्पष्ट केले.

प्रतिकुलतेचे पंख करुन घे भरारी-अॅड. महेश माेहिते

अनंत आमची देहशक्ती आणि अनंत आमची आशा आहे. जीवंत असणे आणि जगणे याच्यामध्ये फरक आहे. अनुकुलतेमध्ये श्वासांच्या पताका फडकवताना अनेक जण जिवंत राहतात, मात्र प्रतिकुलतेचे पंख करुन आस्मान शाेधणारे तेच खरे जगतात. ते जगण शिकवण्यासाठी आजच्या पिढीवर संस्कार व्हावेत. यासाठी घे भरारी या कार्यक्रमाचे आयाेजन केले आहे, असे अॅड. महेश मोहिते यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले. 


याप्रसंगी काेएसाेचे अध्यक्ष गाैतम पाटील, अॅड.विलास नाईक यांच्यावतीने डाॅ.राजश्री नाईक, रमेश धनावडे, तपस्वी गाेंधळी, हर्षद घरत, प्राे.प्रमाेद वेळे, कला पाटील, ऋषी पवार, अभिषेक पवार, सुचिता साळवी, डाॅ. अॅड. निहा राऊत, कंरदीकर यांच्यासह दहावी-बारावीत प्राविण्य मिळवलेल्या 150 हून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. गुरुत्वा महेश माेहिते आणि गिरीजा महेश माेहिते यांना देखील गाैरवण्यात आले.

. . . . .