अलिबाग - (रत्नाकर पाटील)
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर पटसंख्या वाढवण्याचे उद्दिष्ट शिक्षकांना देण्यात आले आहे. जिल्ह्यातील शाळांना २५ टक्के पटसंख्या वाढीचे उद्दिष्ट असून, पूर्तता करणाऱ्या शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक सध्या वाडीवस्तीवर फिरून विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.सोमवार १६ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे.
खाजगी शाळा आणि इंग्रजीचे आकर्षणामुळे ग्रामीण भागातील पालक पाल्यासाठी शहरातील शाळा निवडत आहेत. परिणामी, पटसंख्या घटू लागली आहे. पटसंख्येवर शिक्षकांची पदे नियुक्त असल्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने दिलेल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामीण भागातील शिक्षक धडपडत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतरच किती विद्यार्थी वाढले, हे समजणार आहे. जि. प. शाळांना पटसंख्या वाढीसाठी २५ टक्क्यांचे उद्दिष्ट दिले आहे. सर्वात जास्त पटनोंदणी करणाऱ्या शाळांसह शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे.जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत पटनोंदणी सर्वेक्षण, गृहभेट अभियान राबविले जात आहे.
जि. प. शाळांमध्ये विविध उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांसाठी खेळ, संगणक शिक्षण, विज्ञान प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा घेण्यात येत आहेत. 'माझी शाळा सुंदर शाळा' उपक्रमांतर्गत शाळेचे रूपडे पालटत आहे.स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लर्निंग, स्वच्छ व आकर्षक परिसर, पोषणयुक्त मध्यान्ह भोजन, शिष्यवृत्ती देण्यात येत असल्यामुळे पालक आता जिल्हा परिषद शाळांकडे वळू लागले आहेत. शिक्षकांना वाडीवर जाऊन पटसंख्या वाढीसाठी पालकांशी संपर्क साधून पाल्याला जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व पटवून द्यावे लागत आहे.
कोणत्या तालुक्यातील पटसंख्या किती?
तालुका पटसंख्या
अलिबाग ५०७३ , कर्जत १२६०५ , खालापूर ६१०७ , महाड ५०८३, माणगाव ६२४४, म्हसळा २३६१, मुरुड २४१३, पनवेल २१६१५, पेण ६६०२ पोलादपूर १४४५, रोहा ५३८८, श्रीवर्धन २८३१, सुधागड ३४७३ ,तळा १४२४ ,उरण ४४२८
Social Plugin