बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्याच्या उत्तर भागात डिस्कळ परिसरात वन विभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारित झाले आहे. रात्री-अपरात्री हे प्राणी मानवी वस्तीत घुसून हल्ला करत आहेत. अनपटवाडी, पसूचा मळा, मांजरवाडी तसेच गारवडी भागात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात सुमारे १८ शेळ्या आणि एका जर्सी गायीचा बळी गेला आहे. एका जखमी शेळीला जीवदान देण्यात डिस्कळ पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांना यश आले आहे. याबाबतचा वैद्यकीय अहवाल पाठवण्यात आला असून, वनविभागाच्या वतीने बाधित पशुपालकांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
खटाव तालुक्यात वनविभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारित झालेले आहे. या भागात वन्यजीव प्राणी मोठ्या संख्येने आहेत. रात्री, पहाटे आणि भर दिवसाही ते मनुष्य वस्तीत येत असून, शेतकऱ्यांच्या पशुधनाचा खात्मा करत आहेत. त्यामुळे वस्तीवर राहणाऱ्या आणि पशुधनाची जोपासना करणाऱ्या शेतकरी आणि त्यांच्या महिलावर्गात कमालीची भीती पसरली आहे. काही दिवसांपूर्वी मांजरवाडी येथील महेंद्र पवार यांच्या खंडोबा मंदिराच्या समोर असलेल्या शेडमध्ये बांधलेल्या हजारो रुपये किमतीच्या जर्शी गायीचा पोटापासून पायापर्यंत वन्यप्राण्यांनी अक्षरशः फडशा पडला.
६ जून रोजी गारवाडी येथील सूर्यकांत बिटले यांच्या चार शेळ्या, तर दुपारी त्याच गावातील युवराज निकम यांच्या दोन शेळ्या वन्यप्राण्यांच्या गळाला लागल्याने मृत्युमुखी पडल्या. दि. ३ जुलै रोजी पहाटे अनपटवाडी येथील लक्ष्मण निकम या शेतकऱ्याच्या १३ गाभण शेळ्या त्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेल्या.
४ जुलै रोजी भर दुपारी डिस्कळजवळ असलेल्या पसूचा मळा येथील शशिकांत कर्णे यांच्या दोन शेळ्यांवर वन्यप्राण्यांनी हल्ला चढवला; मात्र त्यातील एक शेळी बळी गेली आणि एकीला डिस्कळ पशुवैद्यकीय सहायक पर्यवेक्षक आकाश भोसले व वन विभागाचे प्रशांत मदने यांनी तातडीने उपचार केल्याने जीवदान मिळाले. मात्र वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
शासनाने बाधितांना आर्थिक मदत देण्याची आवश्यकता
पशुवैद्यकीय अधिकारी हणमंत जाधव यांनी मृत शेळ्यांचा वैद्यकीय अहवाल सादर केला आहे. मृत शेळ्यांच्या मानेवर, गळ्याला आणि पायावर लचके तोडल्याचे दिसून येत आहे. एखादा प्राणी बराच काळ मृत झाल्यास त्याचे पोटही फुगते. डोंगराळ भागातील वन विभागात वास्तव्यास असलेल्या लांडग्यांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यामुळे घटना झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. बाधितांना आर्थिक मदत शासनाने द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
Social Plugin