बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.

बिलोली तालुक्यातील अटकळी गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदीचा पाणीपातळी वेगाने वाढत असून गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे गावकऱ्यांसह शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अटकळी गावातील शिवारामध्ये उभे असलेले सोयाबीन, तूर, मका, कापूस आदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गाच्या आयुष्याचा आधार असलेली पिके हातातून गेल्याने त्यांच्या समोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. पावसामुळे व पुराच्या धोक्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

गावकऱ्यांची मागणी आहे की प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून पीक नुकसानीचा योग्य अहवाल तयार करावा व शेतकऱ्यांना मदत मिळावी. शासन व संबंधित अधिकारी यांनी त्वरीत मदतकार्य हाती घेऊन शेतकऱ्यांच्या हाताला दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी होत आहे.