महालक्षुम्या आल्या , महालक्षुम्या आल्या
घाबरून नका जाऊ
जेवढं होईल तेवढंच करा
टेन्शन नका घेऊ
काळाप्रमाणे काही गोष्टीत
बदल केले पाहिजे
सोळा भाज्या सोळा चटण्या
कमी केले पाहिजे
एवढेच लाडू तेवढ्या करंज्या
तरकटी नको बाई
काही धरायचं काही सोडायचं
काही होत नाही
( पूर्वीच्या काळी ......)
एकत्र कुटुंब माणसं भरपूर
अन्न खाल्ल्या जायचं
थोडं जास्त झालं तरी
वाया नाही जायचं
गडी माणसं पाहुणे रावळे
चढाओढीने खायचे
Acidity , पोटात गुडगुड
काही नाही व्हायचे
आता काळ बदलला आहे
घरोघरी माणसं चार
माऊल्यांनो खरंच जास्त
होऊ नका तुम्ही बेजार
भला मोठा स्वयंपाक करून
फेकून देऊ नका
अन्न पूर्ण ब्रह्म आहे
कधीच विसरू नका
सण करणं श्रद्धा असणं
हा भाग महत्वाचा
लक्षुम्यांनाही नवैद्य चालतो
फक्त भाजी भाकरीचा
जिवंत लक्ष्मीची बेजारी करण्यास
गौरी-गणपती येत नाहीत
थोडं कमीजास्त झालं तरी
कुणावरही कोपत नाहीत
तुमच्यावर राग राग करायला
देव थोडाच माणूस आहे
महालक्ष्मी असो गणपती असो
फक्त भक्तीचा भुकेला आहे
ऐपतीप्रमाणेच सगळं करा
रिन काढून नको सण
नको लायटिंग नको माळा
फक्त हवे शुद्ध मन
सगळ्यांनी सामील होणं
हे महत्वाचं असतं
खरंच ताण घेऊ नका
काही कामाचं नसतं
आमच्याकडे असं असतं
अन त्यांच्याकडे तसं
ताण न घेता काम करावं
जसं जमेल तसं
गाठीभेटी गप्पागोष्टी
सणासुदीला अपेक्षित असतात
प्रेम आपुलकी वाढण्यासाठीच
दसरा दिवाळी लक्षुम्या असतात
मंत्र जोर जोरात म्हणायचे
अन सासुशी करायची कट्टी
असं वागल्यावर कशी होईल
महालक्षुम्याशी गट्टी ?
राग अहंकार चांगला नसतो
गोडीगुलाबीने वागलं पाहिजे
फटकळ बोलणं सोडून देऊन
घालीन लोटांगण म्हणलं पाहिजे
*श्री रामेश्वर मा. तोंडे(कलाशिक्षक)*
*जि.प. हायस्कूल,मंगरूळ नवघरे.ता चिखली. जि. बुलढाणा





Social Plugin