Ticker

6/recent/ticker-posts

आंध्रुडच्या शिरपेचात मानाचा तुरा'


शिक्षक साहेबराव अंभोरे यांना 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 

   प्रतिनिधी @ साहेबराव अंभोरे  

मेहकर तालुक्यातील जि.प.आंध्रुड शाळेत पदविधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले साहेबराव दौलतराव अंभोरे यांना स्वप्नपूर्ती एज्युकेशन फाउंडेशन,जेजुरी तर्फे शैक्षणिक सामाजिक,क्रिडा व साहित्य या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ' राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार' मिळाला.राज्यभरातून आलेल्या ५४८ प्रस्तावातून साहेबराव अंभोरे यांच्या प्रस्तावाची विविध निकषांच्या आधारे  निवड समितीने निवड केली.महाराष्ट्रातील एकूण ६०शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला.

     26 ऑक्टोबरला मल्हार नाट्यगृह,जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे येथे सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, मानाचा फेटा, मानाचे वस्त्र व गुलाबपुष्प देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. या पुरस्काराने नवप्रेरणा,नवऊर्जा मिळाली असे मत त्यांनी व्यक्त केले. रंजक, आनंददायी अध्यापन पद्धती, नवे कल्पक उपक्रम,आनंददायी शनिवार, संगीत शिक्षण,हस्ताक्षर सुधार असे विविध उपक्रम ते शाळेमध्ये राबवितात.

  आंध्रुड येथील रहिवासी असलेले शिक्षक, गायक, वादक,सूत्रसंचालक,सुवाच्च हस्ताक्षराचे धनी,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते तथा समाजसेवेसाठी रात्रंदिवस झटणारे,अनेकांच्या मदतीला धावणारे असे आंध्रुडचे सुपुत्र साहेबराव अंभोरे यांना आपल्या शैक्षणिक कल्पक उपक्रम , सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य तथा गायन, कलापथक, पथनाट्य या कलेद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केलेल्या समाज प्रबोधनाच्या कार्यासाठी स्वप्नपूर्ती एज्युकेशन संस्था,जेजुरी यांचे तर्फे ' राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार'प्रदान करण्यात आला.

      साहेबराव अंभोरे यांनी ग्रामीण भागामध्ये एका गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतला असला तरी आई वडिलांनी दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवर परिस्थितीवर मात करत शिक्षण, सामाजिक, कला ,क्रीडा, साहित्य,कोरोना योद्धा,अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले. या माध्यमातून त्यांनी आपली महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण केली.या सर्व केलेल्या कार्याची दखल घेत  त्यांना हा  पुरस्कार मिळाला. जसा पाऊस पडतो तसा त्यांच्यावर  अभिनंदननाचा वर्षाव सुरू झाला आहे.

 शिक्षकी पेशा सांभाळण्याबरोबरच शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य व कलापथक, पथनाट्य, गायन, वादन या कलेच्या माध्यमातून 1994 सालापासून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात खेड्यापाड्यात, वाडी वस्ती, तांड्यावर, दऱ्याखोऱ्यातील आदिवासी गावात जाऊन 'स्वरसम्राट'जनजागृती कलामंच, मेहकर या प्रबोधनात्मक संगीत ग्रूप च्या माध्यमातून महापुरुषांचे विचार, दारूबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, बचत,हागणदारीमुक्त गाव, एकता, बंधुता, सामाजिक सलोखा, देशप्रेम, बेटी बचाओ बेटी पढाओ, शेतकरी आत्महत्या,मतदार जनजागृती, संविधान जनजागृती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वाचन चळवळ, पाणी अडवा पाणी जिरवा, नवभारत साक्षरता, कायदेविषयक ज्ञान ,शिक्षणाचे महत्व अशा विविध समाजपयोगी, राष्ट्रउभारणी विषयांवर शेरोशायरी,गीते, कलापथक व पथनाट्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले व निरंतर करत आहेत.आतापर्यंत १००० पेक्षा जास्त प्रबोधनात्मक संगीत कार्यक्रम केलेले आहेत.