Ticker

6/recent/ticker-posts

दिपावली सणानिमित्त अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम सुरु




*भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही होणार*

 अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ 

सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे जालना जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.सण महाराष्ट्राचा -संकल्प अन्न सुरक्षेचा ही राज्यव्यापी मोहीम अन्न व औषध प्रशासनाकडून ऑगस्ट महिन्यापासून राबविण्यात येत आहे.तरी नागरिकांनी दुध व खव्यापासुन तयार केलेली मिठाई 24 तासाच्या आत सेवन करावी,असे आवाहन अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहायक आयुक्त निखील कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत जालना शहरासह जिल्ह्यातील खाद्यपदार्थ उत्पादक,घाऊक विक्रेते, वितरक,मिठाई उत्पादक व विक्रेते यासारख्या आस्थापनांच्या तपासण्या करुन एकूण 41 अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.सदर नमुन्यामध्ये दूध,खवा,पनीर,तूप,खाद्यतेल,मिठाई आणि सुकामेवा आदी अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरुन खाद्यतेलाचा 13 हजार 899 किलोग्रॅम एकुण रुपये 21 लाख 27 हजार 742 रुपये किमतीचा साठा नमुने विश्लेषणाकरीता घेऊन जप्त करण्यात आला आहे.या नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.सदर मोहिम दिवाळीपर्यंत राबविण्यात येणार आहे.तसेच नागरिकांनी परवाना व नोंदणीधारक विक्रेत्याकडुनच खरेदी करावी, मिठाई व नाशवंत अन्न पदार्थांची योग्य तापमानावर साठवणुक करावी.असेही अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कळविले आहे.