अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
जैन धर्मियांच्या पवित्र तीर्थक्षेत्र सिद्धक्षेत्र कुंथलगिरी (ता.भूम,जि.धाराशिव) येथे १६ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्री चोरट्यांनी कहर केला.जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळावर चोरट्यांनी दानपेटी फोडून लाखोंची रक्कम आणि पितळाच्या बहुमोल भगवान मुर्ती चोरीस नेल्याने धार्मिक वर्तुळात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
प्राप्त माहितीनुसार,चोरट्यांनी एका सोनेरी रंगाच्या लोखंडी दानपेटीतील अंदाजे ९ ते १२ लाख रुपये रोख,तसेच पितळ धातूच्या चार पवित्र मूर्तींची चोरी केली आहे.यामध्ये —
1️⃣ नऊ इंच उंचीच्या ५ किलो वजनाच्या दोन मुर्ती,
2️⃣ सात इंच उंचीची ५ किलो वजनाची एक मुर्ती,
3️⃣ अकरा इंच उंचीची ६ किलो वजनाची एक मुर्ती —
असा एकूण पवित्र मूर्तींचा ऐवज चोरीला गेला आहे.
घटनेत १२ ते १५ चोर सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.कुंथलगिरी क्षेत्र समितीने या संदर्भात वाशी पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली असून,तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने जैन समाजात असंतोष निर्माण झाला आहे.
या घटनेमुळे धार्मिक भावनांवर मोठा आघात झाल्याचे समाजातील नागरिकांचे म्हणणे आहे. “आमचे भगवान आणि पवित्र मूर्ती लवकर मिळाव्यात,चोरीचा तपास गतीने व्हावा,”अशी मागणी सकल जैन समाजाने तहसीलदार अंबड यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
*जैन समाजाने दिला इशारा*
“तपास न लागल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन व सरकार जबाबदार राहील.”
धार्मिक भावना दुखावणाऱ्या या गंभीर घटनेने कुंथलगिरी तीर्थक्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून,जैन समाजात प्रचंड रोष पसरला आहे.





Social Plugin