कांदा उत्पादकांची स्थिती; हमीभावाने खरेदीची मागणी
बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या हंगामात मोठे नुकसान झाले असताना, 'यंदा पुन्हा झाले तर लाख, नाही तर पुन्हा राख' असे म्हणत शेतकऱ्यांनी गावरान कांदा लागवडीला मोठया प्रमाणात केली आहे. त्यामुळे कांदयाला बाजारभाव मिळत नसल्याने शासनाने हमीभावाने खरेदी करावी, अशी मागणी होवू लागली आहे.
मागील वर्षी मिळालेल्या अत्यल्प दर ,साठवणुकीतील नुकसान आणि बाजारभावातील अस्थिरतेमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. तरी पर्याय नसताना शेतकरी पुन्हा कांदा पिकाकडे वळला आहे. अनिश्चित बाजारभाव, बदललेले निर्यात धोरण, वाढलेला उत्पादन खर्च, हवामानातील सततचे बदल, या सगळ्या अडचणी सामोरे जात असतानाही गावरान कांदा हेच पीक प्रमाणात टिकाऊ व तुलनेत सुरक्षित मानल्या जाते. गावरान कांदा खर्चात तयार होतो, तर टिकाऊपणा अधिक असतो. दर अनुकूल मिळाल्यास एका हंगामात लाखोचे उत्पादन देण्याची क्षमता या पिकात आहे. यामुळे अनेक शेतकरी जोखीम पत्करून कांदा पिकात नशीब आजमावत आहेत.
मात्र आर्थिकदृष्ट्या शेतात पाणी साचणे, रोगराईचा वाढता प्रादुर्भाव, साठवणुकीच्या दरम्यान मोठे नुकसान होते. तर बाजारातील दलाल व मिळणारा दर शेतकऱ्यांच्या मुळावर उठतो. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मेहनतीचे मोल अक्षरशः राखेत मिळते. असा अनुभव मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांनी वारंवार घेतला असला, तरी जोखीम पत्करुन शेतकरी गावरान कांदयाची लागवड करीत आहेत. यावर्षी पावसाळ्यानंतर जमिनीची तयारी प्रक्रिया लागवडीसाठी लागणारी मजुरी तसेच महागड्या खताचे वाढलेले दर यामुळे लागवडीचा एकूण खर्च कमालीचा वाढला आहे. शिवाय कांदा पिकाला हमीभावाचा आधार नसल्याने चांगला दर मिळेल, या अपेक्षेवर शेतकरी गावरान कांदयाला प्राधान्य देत आहेत.
गत काही वर्षापासून निसर्गाच्या शाश्वत उत्पादनाची हमी उरली नाही. त्यामुळे शेतकरी नवनविन प्रयोग करीत असून, खटाव तालुक्यात कांदा उत्पादन चांगले होते. परंतु बाजारभाव योग्य मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे कांदा उत्पादनासाठी लागणारा खर्च वसूल होण्याची शाश्वती नसते. त्यामुळे जोखीम आहे, पण पर्याय नसल्याने शेतकरी कांदा उत्पादन घेतात.केतन गायकवाड, कांदा उत्पादक शेतकरी, बुध





Social Plugin