Ticker

6/recent/ticker-posts

भोकरदन बसस्थानक परिसरात पोलीस चौकी स्थापन करा- अनिताताई जाधव

 

भोकरदन बसस्थानक परिसरात पोलिस चौकी स्थापन करण्याची मागणी भोकरदन येथे न्युज हायस्कूल ला दामीनी पथकाची भेट मुलींचे केले समुपदेशन

"टवाळखोरांनावर कठोर कारवाईची दामिनी पथकाची ग्वाही "**

भोकरदन  प्रतिनिधी संजीव पाटील:

शहरात काही दिवसापूर्वी शालेय मुलीची छेड काढण्याचे प्रकरण घडल्यानंतर भोकरदन शहरात दामिनी पथकाची स्थापना करून मुलींना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनिताताई जाधव यांनी केली होती.त्या संदर्भातील कट्टा न्युज मराठी सह विविध वर्तमानपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या . पोलिस अधीक्षक जालना जिल्हा अजय कुमार बन्सल अतिरिक्त पोलिस आयुक्त  नोपाणी यांनी लगेच दखल घेतली  आणि दामीनी पथक भोकरदन शहरात पाठविले.पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुरुवारी 22 रोजी जालना येथील दामिनी पथक भोकरदन मध्ये दाखल झाले. पथकाने तक्रारदार सौ अनिताताई जाधव यांना सोबत घेत शहरातील न्यू हायस्कूल गाठत तेथे विद्यार्थिनींची बैठक घेऊन त्यांचे समोपदेशन करताना टवाळखोर मुलांवर कठोर कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.

यावेळी अनिताताई जाधव यांच्या सह दामिनी पथकातील सौ शेंदूरकर मॅडम,ज्योती राठोड, शारदा गायकवाड यांनी उपस्थित मुलींना सविस्तर  केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री बी बी नन्नावरे सर, श्री माळी सर, श्री सुदाम गाडेकर सर,श्री लहानेसर, श्रीमती सयाम मॅडम, श्रीमती लोणे मॅडम, श्रीमती चौधरी मॅडम आदी उपस्थित होते.

 दरम्यान, याबाबत सौ अनिताताई जाधव यांनी दामिनी पथकासह भोकरदन पोलीस निरीक्षक श्री किरण बिडवे यांची भेट घेऊन भोकरदन शहरातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली व यानंतर न्यू हायस्कूल भोकरदन येथील शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते सौ जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,भोकरदन शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मोठया प्रमाणात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी विविध शाळा व महाविद्यालयात दररोज येत असतात. शाळा व महाविद्यालय सुरु होण्याच्या व सुट्टीच्या वेळी विद्यार्थिनींचा पाठलाग करून छेड काढण्याच्या घटना शहरात घडत असून अशा घटनामुळे मुलींच्या शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे. तर काही मुली अशा घटनामुळे व्यथित होऊन शिक्षण सोडण्याच्या मानसिकतेत असून पालकांतूनही याबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. आपल्या मुलींना शिक्षणासाठी पाठवावे की नाही या विवंचनेत बरेच पालक असल्याचे दिसून येत असल्याचे शाळेतील शिक्षक ही सांगत आहेत.

पोलीस प्रशासनाने तात्काळ दामिनी पथकाच्या माध्यमातून मुलींना सक्षम करण्याचे काम करावे व भोकरदन बसस्थानक परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी व पोलीस चौकी स्थापन करण्यात यावी अशी मागणीही शेवटी निवेदनात केली आहे.


मुख्याध्याकांनी मानले आभार..

दरम्यान, मागील काही दिवसापासून टवाळखोर मुलांकडून विद्यार्थिनींना त्रास देण्याचा प्रकार सुरु होता. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ अनिताताई जाधव यांनी आवाज उठवल्यामुळे दामिनी पथकाने शाळेला भेट देऊन विद्यार्थिनींचे समोपदेशन केले. त्यामुळे शाळेसह मुलींना मोठा आधार मिळाल्याची भावना मुख्याध्यापक श्री नन्नावरे यांनी व्यक्त करत अनिताताई जाधव यांचे   विद्यार्थिनी व दामिनी पथकासमोर आभार मानले.