Ticker

6/recent/ticker-posts

ऐन सुगीच्या तोंडावर अवकाळीचे सावट.



शेतकरी चिंतेत; रब्बीची पिके काढण्याची लगबग सुरू

बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे] 

 ऐन सुगीच्या हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिवारात सुगीची लगबग वाढले आहे. गहू, हरभरा व इतर हंगामी पिके हातातोंडाशी आली असून, कापणीच्या कामात व्यग्र असतानाच अवकाळी पावसाचे सावट दाटू लागल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. अचानक ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शक्यतेमुळे उभ्या पिकाच्या नुकसानीची भीती निर्माण झाली आहे. वर्षभराच्या कष्टांचे चीज होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच हवामानाच्या अनिश्चिततेने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

यंदा मेहनत, खतांचा वाढता खर्च, मजुरीचे दर आणि पाण्याचे नियोजन या सगळ्या अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी पिके उभी केली. रात्रंदिवस कष्ट करून जोपासलेली ही शेती आता उत्पन्न देण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र, हवामानातील अचानक बदल, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांच्याकाळजाचा ठोका चुकतो आहे. गव्हाच्या कणसांवर दाणे भरले आहेत. काही ठिकाणी कापणी सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी पुढील आठवड्यात काम हाती घेण्याची तयारी आहे. अशा वेळी अवकाळी पाऊस किंवा वादळी वारे आल्यास उभ्या पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी सध्या शिवारातच मुक्काम ठोकून हवामानाचा अंदाज घेत कामांची आखणी करत आहेत.                           .

 सगळे पीक काढणीला आले, फक्त सुरक्षित कापणी होणं गरजेचं आहे. सुगीचा हंगाम आनंदाचा असतो; पण यंदा मात्र प्रत्येक ढगाकडे भीतीने पाहावे लागत आहे. सोन्यासारख्या पिकावर अवकाळीचे संकट कोसळू नये, हीच प्रार्थना सध्या आहे. मेहनतीच्या घामाचे मोल मिळावे आणि आनंद निर्विघ्न पार पडावा, बस एवढीच अपेक्षा आहे.- विजय शेटे, शेतकरी, जांब (ता. खटाव)    

-