१२ मे २०२६
पालघर प्रतिनिधी :
धनेश क्षिरसागर
बोईसर बाजारपेठेत काल ग्रामपंचायतीकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. जेसीबीच्या सहाय्याने अनेक अनधिकृत दुकाने, शेड व रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईमुळे बाजारपेठेतील वाहतूक कोंडी कमी होईल व नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अवघ्या काही तासांतच आज पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण करून दुकाने उभी करण्यात आल्याचे चित्र समोर आल्याने ग्रामपंचायतीच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बाजारपेठेतील अतिक्रमणामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. इतकेच नव्हे तर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाला देखील अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने धडक कारवाई केल्याने नागरिकांनी सुरुवातीला समाधान व्यक्त केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा तीच दुकाने उभी राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
“जर अतिक्रमण हटवून पुन्हा त्याच ठिकाणी बांधकाम होत असेल, तर कारवाईचा नेमका उपयोग काय?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही स्थानिकांनी तर ग्रामपंचायतीची कारवाई ही केवळ फोटोसेशन व प्रसिद्धीसाठीच होती का? असा थेट आरोप केला आहे.
विशेष म्हणजे, काल तोडण्यात आलेली दुकाने आज पुन्हा उभी राहत असतील तर संबंधित अतिक्रमणधारकांना कोणाचे संरक्षण मिळत आहे का? अशीही चर्चा बाजारपेठेत रंगू लागली आहे. सामान्य नागरिकांनी किरकोळ नियमभंग केला तरी तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाते, मग वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई का होत नाही? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, वारंवार कारवाई करून पुन्हा अतिक्रमण उभे राहत असल्याने शासकीय यंत्रणा, मनुष्यबळ आणि निधीचा अपव्यय होत असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीने केवळ अतिक्रमण हटविण्याचा दिखावा न करता संबंधितांवर कायमस्वरूपी व कठोर कारवाई करावी, तसेच पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर दंडात्मक गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये एकच प्रश्न चर्चिला जात आहे — “बोईसर बाजारपेठेतील अतिक्रमण कायमचे हटवले जाणार, की कारवाई फक्त नावालाच राहणार?”





Social Plugin