बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही आईने उपसले अपार कष्ट प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले घवघवीत यश वाकेश्वरमध्ये गुलाल आणि पुष्पहार घालून जोरदार जल्लोष आजच्या अत्यंत कठीण, खडतर आणि तीव्र स्पर्धात्मक युगात शासकीय नोकरी मिळवणे म्हणजे गगनाला गवसणी घालण्यासारखेच आव्हान बनले आहे. पण मनात जिद्द, अदम्य चिकाटी आणि आईचे आशीर्वाद पाठीशी असतील, तर कोणत्याही परिस्थितीवर मात करून यश खेचून आणता येते, हेच रेवलकरवाडीच्या कन्येने आणि वाकेश्वरच्या सुनेने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. रेवलकरवाडी गावची माहेरवाशीण आणि वाकेश्वर गावची नवनियुक्त सून सौ.ऋतुजा महेश फडतरे (माहेरची ऋतुजा पांडुरंग जगदाळे) यांची 'मुंबई पोलीस' दलात अधिकृत नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे संपूर्ण रेवलकरवाडी व वाकेश्वर येथे अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऋतुजा यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या माऊलीवर आली होती. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि हलाखीची असतानाही, त्यांच्या आईने स्वतः अपार कष्ट उपसले, पण मुलीच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. ऋतुजा यांनीही आपल्या आईच्या घामाची पूर्ण किंमत राखत, पदवीपर्यंतचे (ग्रॅज्युएशन) शिक्षण अत्यंत जिद्दीने पूर्ण केले.
ऋतुजा यांचे प्राथमिक शिक्षण रेवलकरवाडी येथे सातवीपर्यंत झाले. त्यानंतर पुसेगाव येथील नामांकित 'हनुमानगिरी कॉलेज मध्ये त्यांनी ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. पोलीस भरतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी मुंबईतील घणसोली येथील अर्कैडमीमध्ये अहोरात्र मैदानी व लेखी परीक्षेचा सराव केला. अखेर त्यांच्या कष्टाचे चीज झाले आणि आईचे स्वप्न पूर्ण करत त्यांनी खाकी वर्दीला गवसणी घातली.
लग्नानंतर नुकतीच वाकेश्वर गावची सून झालेल्या ऋतुजा यांच्या या यशाची बातमी समजताच फडतरे कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आजच्या कठीण बेरोजगारीच्या काळात मिळवलेले हे यश संपूर्ण कुटुंबाला एक नवी ओळख देणारे ठरले आहे. ऋतुजा यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे पती श्री. महेश गोरख फडतरे व कुटुंबीयांनी त्यांचे गुलाल उधळून आणि पुष्पहार घालून अत्यंत उत्साहात व भावूक वातावरणात स्वागत केले. नवनियुक्त महिला पोलीस अधिकारी सौ. ऋतुजा आणि त्यांचे पती महेश फडतरे यांच्या चेहऱ्यावरील हाच आनंदाश्रू आणि स्वाभिमानाचा क्षण परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
एका सामान्य गरीब कुटुंबातील मुलीने आणि वाकेश्वरच्या सुनेने प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत मिळवलेले हे यश परिसरातील इतर अनेक तरुण-तरुर्णीसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील मुलींसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरणार आहे. सौ. ऋतुजा महेश फडतरे यांच्या या यशाबद्दल राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





Social Plugin