

महाराष्ट्र ग्रामीण न्यूजप्रतिनिधी : विजय अधिकार, जव्हार
जव्हार शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक आणि पादचारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यांची अधिकच दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
दररोज या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. खराब रस्त्यांमुळे वाहतूक संथ होत असून दुचाकीस्वारांना विशेषतः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.





Social Plugin