Ticker

6/recent/ticker-posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या - अमोल गायकवाड


मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

मालेगाव : जिल्ह्यात जोरदार पाऊस चालू असून मालेगाव व रिसोड तालुक्यात पावसाने नदी नाले एक झाले. परिणामी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रिसोड मालेगाव विधानसभा अध्यक्ष अमोल पाटील गायकवाड यांनी केली आहे. 

             जिल्ह्यात ढगफुटी सदृश संततधार पावसाने थैमान घातल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच मालेगाव व रिसोड तालुक्याला तीन वेळा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा बिकट परिस्थितीत प्रशासनाकडून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अमोल पाटील गायकवाड यांनी केली आहे. मालेगाव व रिसोड तालुक्यात झालेल्या पावसामुळे लहान, मोठ्या नदीनाल्यांना पूर आला होता. तालुक्यातील ही सलग दुसरी व तिसरी नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी उभ्या पिकांसह खरडून गेल्या आहेत. तर, इतर शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचे तळे साचल्याने पिकांची नासाडी झाली आहे. परिणामी, पहिलेच कर्जाच्या बोझात असलेल्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने कंबरडे मोडले आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकाऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज असून ती देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मालेगाव रिसोड विधानसभा अध्यक्ष अमोल पाटील गायकवाड यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन पाठवले आहे.