Ticker

6/recent/ticker-posts

मागणी आणि दरअभावी खटाव तालुक्याच्या उत्तर भागात ऐरणीत सुमारे ३०० ट्रक कांदा अद्यापही पडून...



कांदा खराब होत असल्याने शेतकरी हवालदिल 

बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

       खटाव तालुक्यातील उत्तर भागात रब्बी हंगामातील गारवा कांद्याची लागण मोठ्या प्रमाणात होत असते. हजारो एकर क्षेत्रावर गतवर्षी घेतलेला सुमारे तीनशे ट्रक कांदा केवळ दर व मागणी अभावी नऊ महिने झाले तरीही अद्याप ऐरणीत पडून आहे. कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला असून साठवलेला कांदा सडू लागल्याने उकिरड्यावर किंवा रस्त्यावर  फेकून द्यायची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे खटाव तालुक्यातील उत्तर भागात पुसेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

          गतवर्षी कांद्याला कांद्याला बाजारभाव मिळत होता.कांद्याच्या दरात नक्कीच वाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची ऐरणीत साठवणी केली .मात्र सद्यस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाचे कृषी विषयक चुकीचे धोरण आणि अन्य कारणांमुळे कांद्याचे भाव चांगलेच कोसळले आहेत. मोठ्या अपेक्षेने जपलेला कांदा सध्या मातीमोल होत आहे. शेतकऱ्यांना आपला कांदा रस्त्यावर ओतून देण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा सडू लागल्याने मातीमोल भावात शेतकऱ्यांना कांद्याची विक्री करावी लागत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.

 कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा कांद्याची रोपे तयार करण्यापासून ते लागवड करण्यावर खूप मोठा खर्च झालेला आहे. कांदा काढण्यासाठी वेळेत मजूर मिळत नसल्याने दुप्पट मजुरी ने पीक काढणी शेतकऱ्यांना करावी लागली आहे. सध्या काही व्यापाऱ्यांकडून अत्यल्प भावात कांद्याची खरेदी करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी कांदा चाळीत तर काहींनी ऐरणीत साठवला आहे,   शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणावर सडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अत्यल्प भावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होताना दिसून येत आहे.  शासनाने शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे लक्ष देऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे


पाणीपुरीच्या गाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वच खाद्यपदार्थ व्यवसायाच्या ठिकाणी कांद्याचा उपयोग होतो. तरीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय का मिळत नाही? कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. किती दिवस शेतकऱ्यांनी आपला कांदा ऐरणीत ठेवायचा?  डोळ्यादेखत होणारी कांद्याची नासाडी आता शेतकऱ्यांना पाहवेना. शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा  अंत न पाहता कांद्याच्या पिकाला हमीभाव जाहीर करावा --सुधाकर यशवंत  फडतरे,कांदा उत्पादक शेतकरी, फडतरवाडी(बुध)