
(वाशिम प्रतिनिधी: ओंकार पुरी)
मुंबई: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली की, राज्याची अर्थव्यवस्था अर्धा ट्रिलियन डॉलर ($500 Billion) पार करणारी देशातील पहिली अर्थव्यवस्था ठरली आहे. गेल्या ११ वर्षांतील प्रगतीचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, २०१२-१३ मध्ये १३ लाख कोटींवर असलेली आपली अर्थव्यवस्था आज ५१ लाख कोटींवर ($६६० बिलियन) पोहोचली आहे.
५ ट्रिलियन डॉलरच्या उद्दिष्टाकडे वाटचाल
राज्याने २०२९ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. 'व्हिजन डॉक्युमेंट'नुसार, या प्रवासात १० लाख नवीन रोजगार निर्मिती आणि दरडोई उत्पन्नात १० पट वाढ करण्याचे नियोजन आहे. बेल्जियम सारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी तुलना करत, मुख्यमंत्री म्हणाले की १ ट्रिलियनचा टप्पा गाठल्यानंतर महाराष्ट्र जगातील पहिल्या १५ अर्थव्यवस्थांच्या पंक्तीत जाऊन बसेल.
बेरोजगारीचा दर ३.१ टक्क्यांवर
विरोधकांनी उपस्थित केलेल्या बेरोजगारीच्या मुद्द्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी मांडली. २०२१-२२ मध्ये ४ टक्के असलेला बेरोजगारीचा दर २०२३-२४ मध्ये ३.३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे आणि २०२५ मध्ये तो ३.१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा दर कमी होत असल्याचा दावा सरकारने केला आहे.
दीड लाख सरकारी नोकऱ्यांचे उद्दिष्ट
शासकीय भरती प्रक्रियेबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले की, महायुती सरकारने आतापर्यंत १ लाख २० हजार ४४९ लोकांना नियुक्त्या दिल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत ही संख्या १.५ लाख पार करेल. ७५ हजार नोकऱ्यांचे आश्वासन दिले असताना प्रशासनाने त्यापेक्षा अधिक वेगाने काम केल्याचे त्यांनी नमूद केले.
नाशिकचे जागतिक ब्रँडिंग आणि मराठीची सक्ती
कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे. गोदावरी स्वच्छता आणि शाश्वत शहर म्हणून नाशिक विकसित केले जाईल. याचसोबत, भाषेच्या राजकारणावर ठणकावून सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, "राज्यात सक्तीची फक्त मराठीच असणार", असे स्पष्ट करत त्यांनी मराठी भाषेचा सन्मान जपण्याची ग्वाही दिली.




Social Plugin