Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत येरगी येथे सिनेमा कलाकारांची भेट



देगलूर: प्रतिनिधी 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्राम विकासाला चालना मिळण्यासाठी आज शुक्रवार चालुक्य कालीन नगरी येरगी येथे अभिनेते संदीप पाठक व अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी भेट दिली व ग्रामस्थांशी विविध विषयावर चर्चा केली.

१३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता सदरील सिनेकलाकरांचे गावात आगमन होताच गावातील महिला व बालिका पंचायत राज समितीच्या वतीने त्यांची ओवाळणी करून स्वागत करण्यात आले. यांच्यासोबत उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी.गिरी,गट विकास अधिकारी श्रीकांत बळदे,जिल्हा परिषद नांदेड चे विस्तार अधिकारी दमकोंडवार, सरपंच संगीता मठवाले, संतोष पाटील, कृषी अधिकारी सजु लाहाणे, ग्रामपंचायत अधिकारी तथा राज्य प्रवीण प्रशिक्षक यशदा मधुकर मोरे, दत्तात्रेय कुरूदे, बालाजी कोटेवाड, आदी. उपस्थित होते. यानंतर लेझीम पथकाने नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. लेझीम पथकाने सिने कलाकारांचे लक्ष वेधून घेतले.तर प्रमुख पाहुण्यांना अभिजीत बरसमवार यांनी सजवलेल्या बैलगाडीतून गावात आणण्यात आले. यामुळे आलेले अभिनेते व प्रमुख पाहुणे या अस्सल गावठी सत्काराने भारावून गेले होते.

यानंतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी बालिका पंचायत राज समिती व ग्राम पंचायत च्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पहार,सरस्वती मातेची प्रतिमा व येरगी या इतिहासाचा वारसा दर्शवणारा कॉफी टेबल बुक देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात संतोष पाटील यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. यामध्ये आज पर्यंत गावातील विविध अंगाने झालेल्या विकासाची माहिती दिली.

यानंतर बालिका पंचायत राज चे सरपंच अंजली वाघमारे यांनी गावात बालिका पंचायत राज समितीच्या वतीने घेतलेल्या विविध ऐतिहासिक निर्णयांची व त्यांच्या अंमलबजावणीची माहिती देऊन बालिका पंचायत राज च्या कार्यपद्धतीची ओळख करून दिली.त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांनी येरगीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

यानंतर अभिनेता संदीप पाठक व रसिका वेंगुर्लेकर यांनी बालिका पंचायत राज व ग्राम पंचायत यांच्या मार्फत आई वडिलांचे पालन पोषण न करणाऱ्यांच्या विरुद्ध,हुंडा बंदी,कन्या भरून हत्या,जन्मलेल्या मुलीचे संतोष पाटील यांच्याकडून मोफत काढण्यात येत असलेले सुकन्या योजना खाते आणि इतर उपक्रमांची प्रशंसा केली.तसेच अगदी महाराष्ट्राच्या टोकावर व तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असलेल्या येरगी गावात बालिका पंचायत राज चे अतुलनीय कार्य चालते तसेच दर रविवारी सुरू असलेले स्वच्छता अभियान याची प्रशंसा करत येरगी गावात येण्याचे भाग्य आम्हाला लाभले अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वाटप अभिनेत्यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये महिलाना पैठणीच्या साड्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेश तोटावाड यांनी केले तर आभार बालिका पंचायत राज समितीने मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालिका पंचायत राज समिती,ग्राम पंचायत,गावातील सर्व नागरिक व विविध समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम केले.