Ticker

6/recent/ticker-posts

वसना उपसा सिंचन योजनेला प्राधान्याने पाणी सोडविण्याची मागणी



           सातारा : वसना उपसा सिंचन योजनेअंतर्गत उन्हाळी हंगामासाठी अद्याप पूर्ण पाणीपुरवठा झालेला नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य अमित लक्ष्मणराव चव्हाण यांनी पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सातारा यांच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

           निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, योजनेच्या माध्यमातून सर्व आवर्तनांसाठी पूर्ण पाणीपुरवठा झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांची पिके करपण्याच्या मार्गावर असून मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

           जिल्ह्यातील इतर उपसा सिंचन प्रकल्पांना पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना वसना उपसा सिंचन प्रकल्पास मात्र आवश्यक प्राधान्य दिले जात नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे हक्काच्या पाण्यापासून शेतकरी वंचित राहत असून जनतेमध्ये तीव्र नाराजी वाढत असल्याचे म्हटले आहे.

या गंभीर परिस्थितीचा विचार करून संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, तसेच टंचाई मधूनही उत्तर कोरेगावातील गावांना पाण्याची व्यवस्था करवी अशी मागणी अमित चव्हाण यांनी केली आहे.

           यावेळी नियोजन समिती सदस्य दत्तू भाऊ धुमाळ, सतीश धुमाळ, कुमार भोईटे, शेखर काटकर, सागर चव्हाण , विजय बुरुंगले व ग्रामस्थ उपस्थित होते